
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम केले जाते, मात्र अनेकदा ही सफाई थातूरमातूर होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत असतात. याच पार्श्वभूमीवर, यावर्षीची नालेसफाई केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष जमिनीवर व्हावी आणि कामात पारदर्शकता असावी, या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष लहामगे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. नालेसफाईवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही पावसाळ्यात रस्ते बंद होतात, ही गंभीर बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
कामात पारदर्शकता आणण्यासाठी सफाई करण्यापूर्वीचे आणि सफाई झाल्यानंतरचे फोटो काढणे बंधनकारक करावे, अशी महत्त्वाची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. शहरातील तिन्ही झोनमध्ये काम सुरू असताना संबंधित विभागाचे किमान दोन कर्मचारी देखरेखीसाठी नियुक्त करावेत. तसेच, ज्या प्रभागात सफाई होणार आहे, तिथल्या लोकप्रतिनिधींना (नगरसेवकांना) पूर्वसूचना देऊन काम पूर्ण झाल्यावर त्यांचे समाधानकारक कामाचे प्रमाणपत्र घेण्यात यावे, जेणेकरून कामाचा दर्जा राखला जाईल.
केवळ यंत्रांचा वापर न करता जिथे नाले अरुंद किंवा गोलाकार आहेत, तिथे मनुष्यबळाचा वापर करून पूर्ण गाळ काढण्यात यावा, अशी सूचनाही लहामगे यांनी केली आहे. विशेषतः जिल्हा परिषद समोरील पेट्रोल पंप ते प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पुतळ्यापर्यंतची नाली सध्या उन्हाळ्यातही चोकअप असल्यामुळे पाणी रस्त्यावर वाहत आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक उग्र रूप धारण करून रस्ता बंद होऊ शकतो, त्यामुळे या विशिष्ट भागातील नाली सफाईकडे प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
दरवर्षी पावसाळ्यात रस्ते जलमय होऊन नागरिकांची जी गैरसोय होते, ती यावर्षी टाळण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच कडक पावले उचलावीत, अशी विनंती काँग्रेस कमिटीने केली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असताना नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळायला हवा, अन्यथा कामात हलगर्जीपणा झाल्यास तीव्र भूमिका घेतली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाप्रसंगी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, प्रोफेशनल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामकृष्णा कोंड्रा, नगरसेवक रामनरेश यादव, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर व शहजाद अहेमद, अतुल ठाकरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.















