
आशिष बिरिया, विशेष तालुका प्रतिनिधी, चंद्रपूर – चंद्रपूर : शहरातील जलनगर वार्डातील लेंडारा तलाव परिसरात नालीच्या सांडपाण्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नाल्याचे दूषित पाणी अनेक घरांमध्ये शिरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप व तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या गंभीर समस्येकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गुरुवार, दि. 12 जून 2026 रोजी महानगरपालिकेत जाऊन महापौर महोदया यांना निवेदन सादर केले. तसेच आयुक्तांची भेट घेऊन सांडपाण्यामुळे उद्भवलेल्या अडचणींची माहिती दिली.
नागरिकांनी नाली पूर्ववत सुरू करून सांडपाण्याचा निचरा सुरळीत करण्याची आणि परिसरातील समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. दूषित पाणी घरांमध्ये शिरत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी महापौर महोदया व आयुक्तांनी नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संबंधित विभागाला आवश्यक सूचना देत लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून सांडपाण्याच्या समस्येतून कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.












