
विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
आई-वडिलांचे संस्कार आणि शिक्षकांनी दिलेली प्रेरणा यामुळेच मी अधिकारी पदापर्यंत झेप घेऊ शकली. जिद्द, सातत्य, संयम व आत्मविश्वास या चतुसूत्रीचा अवलंब केल्यास कुणालाही अपयश मिळू शकत नाही असे विचार नुकत्याच एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकता नागदेवते यांनी व्यक्त केले. ते विद्या प्रसारक संस्था द्वारा संचालित सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही येथे आयोजित वर्ग दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष योगेंद्रजी जयस्वाल हे होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव अरविंद जयस्वाल, सदस्य सुदामराव खोब्रागडे, प्राचार्य डॉ. राजेश डहारे, प्राचार्य अतुल केकरे, प्राचार्य संगीता यादव, माता बालक व पिता पालक संघाचे संदीप बोरकर, विलास लाकडे, वचलाताई मेश्राम, पर्यवेक्षक सुनील सुकारे,पर्यवेक्षक विलास धुळेवार, शालेय मुख्यमंत्री इशिता ढोरे हे उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. यश प्राप्त करण्यासाठी मला सहा वर्ष घालवावे लागले परंतु मी हार मानली नाही. दरम्यान कोरोना काळ व मला प्रेरणा देणारे माझे वडील मला सोडून गेले. मी माझ्या ध्येयापासून डगमगले नाही. मला आत्मविश्वास होता की एक दिवस मी माझा ध्येय साध्य करीन. या शाळेने मला खूप काही शिकविले आहे त्यामुळेच मी माझा ध्येय ठरवू शकले असेही एकता नागदेवते यांनी सांगितले. अध्यक्ष भाषणात योगेंद्र जयस्वाल यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून त्या त्या क्षेत्रात आपले कार्यक्षेत्र ठरवावे असे विचार व्यक्त केले.
निरोप समारंभात विद्यार्थिनींनी आपले शाळेतील अनुभव व्यक्त केले. दहावी व बारावीत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सचिव अरविंद जयस्वाल, प्राचार्य राजेश डहारे, प्राचार्य अतुल केकरे,प्राचार्य संगीता यादव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन अर्पिता रामटेके व प्रा. नितीन खोब्रागडे, प्रस्ताविक पारुल नागदेवते तर आभाप्रदर्शन दर्शनी झाडे हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्ग नववी व अकरावी च्या विद्यार्थ्यांनी सह शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.














