नाना-नानी पार्क आनंद निर्माण करणारे केंद्र ठरेल

0
35

आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पार्कची निर्मिती पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी झाडे लावावे

भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर- दि.२६ – चंद्रपूर येथील नाना- नानी पार्क पर्यावरणाच्या संवर्धनात महत्वाची भूमिका निभावेल. यासोबतच लहान-थोरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारे केंद्र ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

वन विभागाद्वारे आयोजित चंद्रपूर येथील नाना-नानी पार्कच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री प्रा.डॉ. अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, लॉयड्स मेटल्सचे मधुर गुप्ता, तुलसी गुप्ता, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश देवतळे, मनोज पाल, प्रदीप किरमिरे यांच्यासह वन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

वन मंत्री असताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नाना-नानी पार्क करिता दोन कोटी रुपये मंजूर करण्यासाठी पुढाकार घेतला होता. या पार्कचे लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहताना आ. मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले.

पुढे बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, क्लायमेट चेंज ग्लोबल वार्मिंग मध्ये वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी सर्व एकत्र येऊन चंद्रपूर जिल्ह्यात काम करीत आहोत. यातूनच बॉटनिकल गार्डन, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम, एपीजे अब्दुल कलाम उद्यान निर्माण झाले. याच कार्यात आता नाना-नानी पार्कची भर पडत असल्याचा आनंद आहे. चंद्रपूर शहरात 15 उद्यान तयार झाले आहेत. हे सर्व पार्क शहरातील श्वास घेण्याजोग्या जागा ठरत आहेत. शहर वेगाने पुढे जाताना शहराचा पर्यावरणीयदृष्ट्या विकास व्हावा यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. ‘सी फॉर चंद्रपूर’ आणि ‘सी फॉर क्लायमेट चेंज’ चे मोठे केंद्र व्हावे या हेतूने चंद्रपूरमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली. चंद्रपूरचे नाव जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी हा महत्वाचा पुढाकार आहे, असेही ते म्हणाले.

ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवड व संवर्धन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. हे पार्क कुटुंबांसाठी आनंद केंद्र निश्चित बनेल, असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी झाडे लावावे असे आवाहन देखील केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here