चंद्रपूर – दि. 4 जून : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 10 वी व 12 वी नंतर व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेता याव्यात, यासाठी आवश्यक असलेली रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते.
शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 15 मार्च 2025 पर्यंत स्वीकारण्यात आले होते. अर्ज प्रक्रियेनंतर योजनेच्या अनुषंगाने काही विद्यार्थ्यांचे अर्ज “सेंड बॅक” करण्यात आले आहेत. हे अर्ज विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले असून त्यामध्ये आवश्यक कागदपत्रांची कमतरता, चुकीची माहिती, किंवा प्रणालीद्वारे मागवलेली पूर्तता बाकी आहे.
त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपले अर्ज विहित मुदतीत 9 जून 2025 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. मुदतीच्या आत अर्जातील त्रुटींची पूर्तता न झाल्यास, संबंधित अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे कायमस्वरूपी ‘Discard’ करण्यात येतील. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचा अर्ज अमान्य ठरणार असून, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
एकदा अर्ज ‘Discard’ झाल्यानंतर कोणतीही दाद किंवा अपील स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी ही अंतिम संधी समजून अर्जातील त्रुटी तात्काळ दूर करून अर्ज पूर्ण करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती, अर्ज स्थिती आणि त्रुटी पूर्ततेची प्रक्रिया https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयातील समन्वयक किंवा समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा, असेही समाजकल्याण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

