पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक
चंद्रपूर, दि. 9 जून : जिल्हा नियोजन समितीचा निधी हा विकासाच्या कामासाठी उपयोगात आणला जातो. या निधीचे वितरण करताना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच वाटप करण्यात येईल. तसेच जिल्ह्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, जेणेकरून जिल्ह्यातील सर्व प्रश्न तातडीने मार्गी लागावे, असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले.
नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खासदार सर्वश्री प्रतिभा धानोरकर, डॉ. नामदेव किरसान, आमदार तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सर्वश्री सुधाकर अडवाले, अभिजीत वंजारी, किशोर जोरगेवार, कीर्तीकुमार भांगडीया, करण देवतळे, देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा नियोजनअधिकारी संजय कडू तसेच इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सन 2024 – 25 मध्ये सर्वसाधारण योजनेचे 456 कोटी, आदिवासी उपयोजनेचे 103 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेचे 75 कोटी असे एकूण 634 कोटी 42 लक्ष निधी विकास कामांवर खर्च करण्यात आला आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, आरोग्य हा अतिशय महत्त्वाचा विषय असून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक केंद्र व उपकेंद्रासाठी निधी दिला जाईल. तसेच अद्यावत सोयी सुविधा या केंद्रामधून देण्यात येईल. त्यासाठी विशेष प्रस्ताव पाठवावा. जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे बांधकाम आवर्जून पूर्ण करावे. नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्यांना सुद्धा निधी देण्यात येईल.
ग्रामीण भागातील नागरिक योजनांपासून वंचित राहू नये, त्यासाठी जिल्ह्याचा एक चांगला प्रस्ताव तयार करावा. सर्व तालुका स्तरावर क्रीडा विकासासाठी आणि व्यायामशाळांसाठी वाढीव निधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह ग्रामीण भागात औषधींसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मृतदेह मोफत घरी नेण्यासाठी शववाहिकांची संख्या वाढवावी. जिल्ह्यातील ‘ब’ आणि ‘क’ दर्जाच्या तीर्थक्षेत्रांना सुध्दा निधी देण्यात येईल. सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच या निधीचे वाटप करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. तसेच आजच्या बैठकीला जे अधिकारी गैरहजर असतील, त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी खासदार आणि आमदारांनीसुद्धा आपापल्या सूचना मांडल्या.
राजशिष्टाचारानुसारच विकासकामांचे लोकार्पण व्हावे : शासनाच्या निधीतून विकासकामांचे लोकार्पण होत असतांना ते राजशिष्टाचारानुसारच व्हावे. लोकप्रतिनिधींची नावे कोनशिलेवर टाकावी. असे निर्देश पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी दिले.
या विषयांवर झाली चर्चा : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कृषी, आरोग्य, वने, पर्यटन, शिक्षण, अवकाळी पावसाने नुकसान झालेले पंचनामे, कृषी पंप जोडणी, जिल्हा परिषद, पोलीस विभाग व इतर सर्व विषयांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. तसेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त कायम करणे व इतिवृत्तावरील अनुपालनास मान्यता प्रदान करणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2024 -25 अंतर्गत खर्चास मान्यता देणे, सन 2025 -26 अंतर्गत खर्चाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

