गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. २३ जून: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री मा. ॲड. आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील विविध विभागांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने आपत्ती व्यवस्थापन आणि कृषी विभाग यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, असे निर्देश मा. सह पालकमंत्री यांनी दिले. तसेच, शेतकऱ्यांच्या अडचणी, बी-बियाण्यांचा पुरवठा, खतांचा साठा, आणि इतर कृषीविषयक योजनांचा आढावा घेत उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
यानंतर जिल्हा परिषद गडचिरोलीच्या सभागृहात जिल्हा परिषदच्या सर्व विभागांची स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार रामदास मसराम सुद्धा उपस्थित होते. त्यांनी बैठकीदरम्यान आपल्या भाषणात विविध विभागांच्या कामकाजावर प्रकाश टाकला व नागरिकांशी थेट निगडित असलेल्या समस्यांवर त्वरित कार्यवाही व्हावी अशी मागणी केली.
या बैठकीत शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, ग्रामविकास आदी विषयांवर देखील सविस्तर चर्चा झाली.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करत असून नागरिकांच्या हिताचे निर्णय लवकरात लवकर अमलात आणण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

