
राखी ताजने यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
राजुरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे आजच्या जगातील सर्वात वेगाने वाढणारे तंत्रज्ञान ठरत आहे. शिक्षण, उद्योग, वैद्यकीय सेवा, शेती अशा सर्वच क्षेत्रात AI चा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असून भविष्यातील करिअरसाठीही या क्षेत्रात अफाट संधी उपलब्ध आहेत.
याच अनुषंगाने महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) च्या वतीने आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, राजुरा येथे “AI मार्गदर्शन कार्यक्रम” आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिलेल्या राखी ताजने यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, “AI हे केवळ तंत्रज्ञान नसून जीवन सुलभ करणारे साधन आहे. स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थिनींनी डिजिटल कौशल्य आत्मसात करून भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा.”
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वसतिगृह गृहपाल सौ. जे. ए. गाजर्लावार यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून राकेश उराडे (ALC समन्वयक, व्यंकटेश कम्प्युटर इन्स्टिट्यूट) उपस्थित होते.
स्नेहा मडावी यांनी कार्यक्रमाचे उत्तमरीत्या संचालन केले. एकूण ७९ विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.















