
वाशिम – दि.१३ सप्टेंबर महसूल विभागाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रिसोड तालुक्यातील महसूल प्रशासनाने विशेष तयारी सुरू केली आहे.
तहसील कार्यालय, रिसोड येथे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
बैठकीत तालुक्यातील शेत रस्ते व पाणंद रस्त्यांचे सीमांकन करून त्यांना क्रमांक देणे, नकाशावर रस्त्यांची नोंद करणे, तसेच समाधान शिबिरे आणि संवाद सभेद्वारे तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याचे ठरले.
गृहनिर्माण योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला.
सेवा पंधरवडा अधिक प्रभावी करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात युवा संवाद, शेतकरी संवाद सभा, ग्रामसभा, निबंध स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर, ‘जिवंत सातबारा’ उपक्रम आणि विमुक्त भटक्या जमातींसाठी ‘आदिशेतू’ योजना यांचा समावेश आहे. तसेच बंजारा तांड्यांना महसूली गावाचा दर्जा देणे आणि गावनिहाय अनाथ मुलांना शासनाच्या योजनांचा लाभ देणे यासंदर्भातही निर्णय घेण्यात आले.
समाधान शिबिरे व स्मशानभूमी नियोजन
रिसोड तालुक्यात २९ व ३० सप्टेंबर रोजी मंडळ स्तरावर समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार असून शेतकरी संवाद सभेद्वारे रस्त्यांशी संबंधित तक्रारींचे तातडीने निराकरण केले जाईल.
ज्या गावांमध्ये स्मशानभूमी नाही, त्या ठिकाणी जागा निश्चित करण्यासाठी संबंधित गावांनी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश तहसीलदार तेजनकर यांनी दिले आहेत.
बैठकीत नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
“रिसोड तालुक्यातील सर्व नागरिकांनी सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत आयोजित शिबिरे, ग्रामसभा व कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे. असे आवाहन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले आहे.















