
खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या मागणीला यश
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : गडचिरोली जिल्हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. मात्र दरवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या युरिया रासायनिक खताच्या पुरवठ्यात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. अपुरा साठा आणि विलंबित पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना युरियासाठी रांगा लावाव्या लागत होत्या व मोठ्या प्रमाणात हेळसांड सहन करावी लागत होती.
ही गंभीर समस्या लक्षात घेऊन गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेलंगणा राज्यातील रामागुंडम येथून थेट युरिया खताचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
खासदार डॉ. किरसान यांच्या या मागणीला यश आले असून, आता रामागुंडम (तेलंगणा) येथून थेट गडचिरोली जिल्ह्यात युरिया खताचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध होणार असून शेती कामांना मोठा दिलासा मिळणार आहे.















