
रांजणगाव गणपती
लक्ष्मण कांबळे
सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी कार्यरत असलेल्या भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी संदीप शेलार यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
संदीप शेलार हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय असून तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांनी संघटनेला बळकटी दिली आहे. त्यांच्या कार्यशैलीत समर्पण, प्रामाणिकपणा आणि संघटन कौशल्य यांचा उत्तम संगम पाहायला मिळतो. त्यांच्या या योगदानाची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर महाराष्ट्र उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
नियुक्ती सोहळ्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. “संविधानाच्या मूल्यांवर चालत समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे,” असे मत प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी व्यक्त केले. संदीप शेलार यांनीही संघटनेच्या उद्दिष्टांसाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या निवडीमुळे महाराष्ट्रातील संघटनात्मक कामाला नवे बळ मिळणार असून राज्यभरात संघटनेची चळवळ अधिक गतिमान होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.















