prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूरच्या भूमीत स्वाभिमानाचा दीप पेटणार – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूरच्या भूमीत स्वाभिमानाचा दीप पेटणार – आ. किशोर जोरगेवार

0
48

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चबुतरा बांधकामाचे भूमिपूजन

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच प्रत्येकाच्या मनात अभिमानाची ज्वाला प्रज्वलित होते. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक व संस्कृतीसमृद्ध शहरात महाराजांचा सन्मानाने पुतळा उभा राहावा, ही प्रत्येक शिवप्रेमीची अनेक वर्षांपासून मनापासूनची इच्छा होती. हीच भावना ओळखून त्या स्वाभिमानाच्या दीपाला आज प्रत्यक्ष रूप देण्याचा ऐतिहासिक क्षण आपल्या सर्वांसमोर साकार होत असून, चंद्रपूरच्या भूमीत स्वाभिमानाचा दीप पेटणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अश्वारूढ पुतळा साकारण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. सदर कामासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर महानगरपालिकेला ९५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने येथे महाराजांच्या पुतळ्याचा चबुतरा, वृक्षारोपण, सौंदर्यीकरण व कोरीव कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी वसुमना पंत, महापौर संगीता खांडेकर, मनपा आयुक्त अकनुरी नरेश, उपमहापौर प्रशांत दाणव, विरोधी पक्षनेते राजेश अड्डूर, स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे, मनपा गटनेता शेखर शेट्टी, सुभाष कासनागोट्टूवार, तुषार सोम, बलराम डोडाणी, नामदेव डाहुले, रवी गुरनुले, दशरथ सिंग ठाकूर, वंदना हातगावकर, स्वप्नील डुकरे, प्रदीप किरमे, सारिका संदूरकर, राहुल पावडे, सैइदा ताजू शेख, शिला श्रीडाम, अनिल फुलझेले, प्रवीण गिलबिले, विनोद शेरकी, प्रसाद जोरगेवार, सुधीर कारंगल, ओमेश आयलू, सुमित बेले, रामकुमार आकापेल्लीवार, प्रलय म्हशाखेत्री, नगरसेवक संजय कंचर्लावार, जितेश कुळमेथे, भालचंद्र दाणव, नगरसेविका पुष्पा उराडे, शितल गुरनुले, सरला कुळसंगे, आशा देशमुख, ज्योती जीवणे, कौसर खान, दिवाकर पुद्दटवार, नकुल वासमवार, राकेश नाकाडे, प्रमोद शास्त्रकार, रेश्मा पांडे, शेखर देशमुख, भाग्येश्री हांडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, तर ते आपल्या स्वाभिमानाचे, पराक्रमाचे आणि स्वराज्याच्या विचारांचे प्रतीक आहेत. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात महाराजांविषयी अपार श्रद्धा आणि प्रेम आहे. एवढ्या मोठ्या महानगरपालिका क्षेत्रात आपल्या आराध्य दैवताचा पुतळा नसणे ही अत्यंत वेदनादायी बाब होती. ही केवळ कमतरता नव्हती, तर आपल्या भावना व्यक्त करण्याची एक अपूर्णता होती.
हीच खदखद मनात ठेवून चंद्रपूरमध्ये महाराजांचा सन्मानाने व अभिमानाने पुतळा उभा राहावा, असा संकल्प करण्यात आला. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, प्रशासनासोबत अनेक बैठका घेण्यात आल्या तसेच विविध विभागांच्या परवानग्या मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पुतळ्यासाठी जागेचा प्रश्नही मोठा होता; मात्र ती जागा महसूल विभागाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून हा मार्ग मोकळा करण्यात आला.
आज उपलब्ध करून दिलेल्या ९५ लाख रुपयांच्या निधीतून या पवित्र कार्याची सुरुवात होत असल्याचा मनापासून आनंद आहे. हा पुतळा केवळ धातूचा नसून, तो आपल्या इतिहासाचा, अस्मितेचा आणि संस्कारांचा जिवंत साक्षीदार ठरेल.
महाराजांचा आदर्श केवळ पुतळ्यात नव्हे, तर आपल्या आचरणातही दिसला पाहिजे. त्यांच्या शौर्याची, न्यायप्रियतेची आणि लोकहिताची प्रेरणा आपण आपल्या जीवनात उतरवली, तरच या पुतळ्याला खऱ्या अर्थाने अभिवादन होईल, असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here