
जालिंदर आल्हाट
ब्युरो चीफ
प्रबोधिनी न्यूज अहमदनगर
9049166415
हिंदू धर्मीयांचा आषाढी एकादशी हा सण व मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण एकाच दिवशी आल्यामुळे, हिंदू धर्मीयांच्या भावनेचा विचार करून राहुरी फॅक्टरी प्रसाद नगर येथील मुस्लिम बांधवांनी समाजाला एक आदर्श संदेश दिला आहे. आषाढी एकादशी निमित्त चक्क रिती रिवाज बदलून बकरी ईदच्या दिवशी दिली जाणारी बकऱ्याची कुर्बानी दिली नाही.
यावेळी मस्जिदचे सदर तैनुर भाई पठाण यांनी सर्व धर्मीय लोकांना आवाहन केले आहे की, आपण धर्माने वेगवेगळे असलो तरीही खरा धर्म मानवता हा आहे. त्यामुळे आपल्या रीती रिवाजामुळे इतर धर्मियांच्या भावना दुखावत असेल तर असे कृत्य न करता या उलट आपण सामाजिक सलोख्यासाठी आपापसात मैत्री, प्रेम निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपण सर्व एकच आहोत हा संदेश यावेळी दिला.
राहुरी फॅक्टरी येथील श्री राजूभाऊ शेटे पाटील मित्र मंडळ, जिव्हाळा ग्रुप, परिसस्पर्श फाउंडेशन, अहमदनगर यांच्या वतीने मुस्लिम बांधवांचा या आदर्श उपक्रमाबद्दल सत्कार सोहळा आयोजित करून अभिनंदन व कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक अभिजीत आहेर यांनी उपस्थित मुस्लिम व हिंदू बांधवांना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थितांना सोशल मीडियामुळे भरकटलेली तरुण पिढी, व एकतेची ताकद या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी अनिल येवले मार्गदर्शन करताना म्हणाले कि, काही राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी लोकांना बेरोजगार ठेवतात, धर्मामध्ये व पोट जातीमध्ये तेढ निर्माण करतात, द्वेष निर्माण करतात की, ज्यामुळे लोक बेरोजगार होऊन यांच्या मागे मागे फिरतात.
प्रत्येक धर्मामध्ये तीन प्रकारचे लोक असतात. ज्यात 10% लोक हे सकारात्मक विचार शैलीचे असतात जे, नेहमी समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा व सर्व धर्मीय आपापसात प्रेमाने राहावेत असा विचार करतात, त्यासाठी प्रयत्नही करतात. दुसऱ्या प्रकारचे 80% लोक असे असतात, ज्यांना स्वतःची विचारधारा नसते. इतर लोक काहीही सांगतील हे, लगेच त्यावर विश्वास ठेवून मेंढ्यासारखे त्यांच्या मागे जातात. मग ते चुकीचे असो वा बरोबर. आणि तिसऱ्या प्रकारचे 10% लोक हे नकारात्मक विचार शैलीचे असतात की, जे जातीवाद व समाजात द्वेष भावना निर्माण करतात. सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून दुसऱ्या प्रकारच्या 80% लोकांच्या मनात विष कालवतात, भडकविण्याचे काम करतात व यामुळेच समाजामध्ये द्वेष भावना निर्माण होते.
पण, आज ज्या 10% सकारात्मक लोकांनी आदर्श उपक्रम राबविला आहे, बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी न देता हिंदू धर्मीयांसाठी आपल्या रितीरिवाजात बदल केला. अशा मुस्लिम बांधवांमुळे फक्त तालुक्यालाच नव्हे तर, संपूर्ण मानवतेला एकतेचा, सामाजिक सलोख्याचा संदेश दिला, असे सर्व लोक आमच्या राहुरी फॅक्टरी गावातील आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे अनिल येवले म्हणाले.
राधाकृष्ण पवार यांनी मुस्लिम बांधव व हिंदू बांधवांना बकरी ईद व आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उद्योजक नारायण घाडगे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
हॉटेल व्यावसायिक संदीप भाऊ कोठूळे यांनी सर्वांना आवाहन केले की, भविष्यातही हिंदू, मुस्लिम, सीख व ईसाई यांच्यामध्ये सामाजिक सलोखा, एकता राहावी असे उपक्रम इथून पुढे असे चालत राहावे अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तैनूरभाई पठाण, मुस्ताकभाई पठाण, शहबाज पठाण, आसिफ शेख, महबूब शेख, शकील शेख, सरफराज पठाण, सोहेल शेख व अन्य मुस्लिम बांधव यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रवी डोखे, संजय राजगुरू, विजय अहिरे, प्रशांत मुसमाडे, अतुल कराड, रवी फुलपगार, वाघमारे भाऊसाहेब व बाळासाहेब गिरी यांनी प्रयत्न केले.














