
किरण खन्ना
जिल्हा संपादक
चंद्रपूर
बुलढाणा येथील सिंदखेडराजा जवळील ट्रॅव्हल्स अपघात प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून मृतकांच्या नातेवाईकांना मदत करा तसेच समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांची मालिका रोखण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी चंद्रपुरातील उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.
नागपूरहून पुण्याला निघालेल्या खासगी बसला बुलढाण्याच्या सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा भागात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात बसमधील जवळपास २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर अपघातातून ८ प्रवासी बचावले आहेत, या दुर्दैवी घटनेतील मृतकांना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.तसेच शासनाने या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी केली.
विदर्भ ट्रॅव्हलस नावाची बस नागपूरहून निघाली होती. बसमधील बहुतांश प्रवासी नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास बसला अपघात झाला. लोखंडी खांब्याला धडकल्यानंतर बस दुभाजकावर आदळली. त्यानंतर बस डाव्या बाजूला उलटली. लोखंडी खांब्यापासून जवळपास १०० फूट दूरवर जाऊन बस पडली. बसचं एक्सेल तुटून तिची चाकं निखळली.बसला अपघात झाला त्यावेळी बरेचसे प्रवासी साखरझोपेत होते. बस डाव्या बाजूला उलटल्यानं पुढील दरवाज्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. त्यावेळी काही प्रवासी मागच्या बाजूला गेले. बसच्या शेवटच्या आसनाच्या शेजारी आणि मागील बाजूस उजव्या बाजूच्या आसनाच्या जवळ असलेल्या इमर्जन्सी एक्झिटमधून ८ प्रवासी बाहेर पडले. त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला.या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून मृतकांच्या नातेवाईकांना मदत करा तसेच समृद्धी महामार्गावर दररोज अपघात घडत आहेत.त्यामुळं शासनाने रस्ते अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी राजू झोडे यांनी केली आहे.














