
आरमोरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
आरमोरी नगर परिषदेतील सत्ताधा-यांच्या व प्रशासनातील अधिका-यांच्या उदासिनतेमूळे शहरातील प्रत्येक वार्डातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे, ढिगभर समस्यांनी शहराला ग्रासले आहे, शहरातील नागरिक बेजार असल्याची बिकट परिस्थिती आहे त्यामूळे वंचित बहुजन महिला आघाडीच्या नेतृत्वात महिलांच्या शिष्ठमंडळाने नगर परिषद मुख्याधिका-यांडे धडक देऊन शहरातील मुलभूत समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी करत नगर परिषदेत ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे यांच्या नेतृत्वात नगर परिषद कार्यालयात धडक देण्यात आली व शहरातील विविध समस्यांचा पाढा वाचून त्या सोडविण्याची मागणी मुख्याधिका-यांकडे करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, तालुका उपाध्यक्ष विकास भैसारे, सदस्य संध्या रामटेके, किरण रामटेके आदि वंचितच्या पदाधिका-यांसह विविध वार्डातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुख्याधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक वार्डात विद्युतचे गंजलेले लोखंडी पोल आहेत ते पोल पडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे त्यामूळे नविन पोल तात्काळ लावण्याात यावे, नुकत्याच बांधलेल्या निकृष्ठ दर्जाच्या नाल्या पहिल्याच पावसात खचून गेल्या आहेत त्याची चौकशी करून संबंधीत कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, शहरातील अनेक वार्डात नाल्या नाहित जेथे आहेत त्या खचून बूजून गेल्या आहेत त्यामूळे पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यांवर चिखलमय परिस्थिती निर्माण झाली आहे त्सामूळे खचलेल्या नाल्यांची रुंदी कमी असून नविन नाल्यांचे बांधकाम करण्यात यावे, शहरातील बहुतांश वार्डात गेल्या दोन महिण्यापासून नळाला पाणी येत नसल्याने पाणी पूरवठा सुरळीत करण्यात यावा, नाल्यांची साफसफाई वेळोवेळी करून डास प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात यावी, शहरातील अंतर्गत सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे तयार करण्यात यावे आदि समस्यांच्या संदर्भाने मुख्याधिका-यांशी सविस्तर चर्चा करून विनाविलंब सर्व समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला.














