स्वातंत्र्याच्या “रक्तरंजित क्रांतीचा” इतिहास सदैव स्मरणात ठेवून देशप्रेम जपावे – विजय वडेट्टीवार

0
156

ब्रम्हपुरी येथे स्वातंत्र्यदिनानिमीत्त देशभक्तीपर नृत्य व गायन कार्यक्रम

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

भारत देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही. या स्वातंत्र्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचा रक्तरंजित क्रांतीचा इतिहास सदैव स्मरणात ठेवून देशप्रेम जपावे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्षनेता तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ते ब्रम्हपुरी येथे युथ फेडरेशन यांच्या वतीने स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित देशभक्तीपर नृत्य व गीत गायन कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्घाटक म्हणून बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे सहउद्घाटक म्हणून बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेश कांबळे तर अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी न.प.सभापती विलास विखार, माजी नगरसेवक डॉ नितीन उराडे, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, अनुकूल शेंडे, अभिजीत देशपांडे हे होते.

यावेळी पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाला मिळालेले स्वातंत्र्य कष्टाने मिळाले आहे. देशावर स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांचे राज्य होते. ते उलथावून स्वातंत्र्य मिळालं. नंतर स्वतंत्र भारतासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली. त्यामुळेच देशातील सर्वधर्म पंथीय व विविध समाजातील नागरिकांना जगण्याचा समान हक्क मिळाला. बाबासाहेबांनी संविधान रुपी दिलेली भेट ही जगातील सर्वोत्कृष्ट भेट आहे असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन, समुह नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड आशिष गोंडाणे, अभिजीत कोसे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here