शासनाच्या फसव्या घोषणा शेतकरी आत्महत्यांचे कारण

0
84

शेतकरी उमेदवार चक्रधर मेश्राम यांचा आरोप

ब्रम्हपुरी प्रतिनिधी: दि.१३/११/२०२४:- महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यानी कर्जाबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार असल्याची टीका ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात शेतकरी ऊस चिन्ह घेऊन लढणारे उमेदवार चक्रधर मेश्राम यांनी केली आहे . यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महायुती आणि महाआघाडीच्या सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. तसेच या बिघाडी सरकारला लोकांच्या प्रश्नांपेक्षा सत्ता टिकवण्याचीच अधिक चिंता असल्याचा आरोपही चक्रधर मेश्राम यांनी केला.
चक्रधर मेश्राम म्हणाले की, “शेतकरी आत्महत्यांना सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार आहेत. अस्थिर , वादग्रस्त ठरलेल्या सरकारला लोकांची चिंता नाही. शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून बिघाड झालेल्या सरकारला आपल्या सत्ता टिकवण्याची चिंता वाटत आहे. सरकारचं हे राजकारण जनता बघत आहे.”
एकीकडे राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करत आहे, तर दुसरीकडे कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरुच आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे. यातून राज्य सरकारच्या कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला की नाही? असा प्रश्न चक्रधर मेश्राम यांनी उपस्थित केला आहे. “राज्य सरकारकडून कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा पराकोटीने प्रामाणिक प्रयत्न करावा मात्र सरकार अपयशी ठरलं आहे. सरकारी यंत्रणेचे नेमकं कुठं चुकते याचे आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दुर्दैवी घटना आहेत”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here