“बाबूजी” संघर्ष एक गाथा लघुचित्रपट प्रीमियर शो सोहळा
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी चंद्रपूर तसेच सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर आयोजित कवयित्री वैशाली धनविजय-रामटेके लिखित ‘बोलत राहिले पाहिजे…’ कवितासंग्रह प्रकाशन सोहळा आणि चित्रपट निर्मिती ‘बाबूजी’ संघर्ष एक गाथा’ (निर्माता व कथालेखक – वैशाली रामटेके) लघुचित्रपट प्रीमियर शो… दिनांक 26 जानेवारी 2025 एन. डी. हॉटेल, चंद्रपूर येथे दुपारी 2 वाजता आयोजित केला आहे..
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्र लेंडे, समीक्षक, अभ्यासक, मराठी विभागप्रमुख रा.तू.म. विद्यापीठ नागपूर, प्रकाशन हस्ते लोकनाथ यशवंत, भाष्यकार इसादास भडके, संध्या विमलमवार आणि प्रमुख पाहुणे मा. नरेंद्र जारोंडे विधीसल्लागार, म. रा. मा. विद्युत कर्मचारी संघटन इत्यादी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
कवयित्रीच्या शब्दात ‘बोलत राहिले पाहिजे…’ ही अशी एक जाणीव आहे जी ‘आपण का बोलायला हवं..?’ याचा अर्थ शोधायला वाचकाला बाध्य करते. बोलत राहिले पाहिजे…ही या कवितासंग्रहाची प्रतिनिधीक कविता असून ती कुटुंबापासून देशपातळीपर्यंत अशा व्यापक अर्थाने अर्थबोध देते. आपल्या माणसांच्या हक्कासाठी, त्यांची सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी ही कविता नेतृत्व स्वीकारायला आवाहन करते. या कवितासंग्रहातील बहुतेक कवितेत मनातील खदखद असून असत्यातून सत्यापर्यंत आणि विचारातून विवेकापर्यंत पोहोचविण्याचा आशयघन प्रयत्न झालेला आहे.
माणसाच्या वाट्याला आलेला संघर्ष जगण्याची दशा बदलण्यासाठी असतो तेव्हा तो संघर्ष आदर्शाच बीज पेरतो ‘बाबूजी ‘ संघर्ष एक गाथा ही याच आयुष्याची एक प्रचिती आहे.. ‘माणूस शिक्षणानेच सुधारू शकतो’ यावर दृढ विश्वास असलेले ‘बाबूजी’ डोमाजी दौलात धनविजय यांच्या आयुष्यावर आधारित पुरस्कार प्राप्त हा माहितीपट आहे.
कवियत्री वैशाली धनविजय – रामटेके ऑनलाईन सतत लिखाण करत असल्या तरी पुस्तक रुपात यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आणि चित्रपटाची पहिलीच निर्मिती असून वाचक, श्रोते स्वागत करत आहेत. सदर कार्यक्रमास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
दिनांक 26.12.26 ला दुपारी 2.00 वाजता मॅजेस्टिक हॉल, एन डी हॉटेल, बापटनगर, चंद्रपूर येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आपणा सर्वांना साक्षीदार होण्यास आमंत्रित करते.

