प्रा. राजकुमार मुसणे
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – श्री.गुरूदेव रंगभूमी प्रस्तुत , कल्लू शिंगरे निर्मित,मा. गोपी रंधये दिग्दर्शित, महाराष्ट्र शासन रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे सदस्य मा. मुकेश गेडाम लिखित संगीत ‘अग्नितांडव’ नाटकाचा जय शिवराय नाट्य कला मंडळ आयोजित दिघोरी येथे २३ जानेवारीला यशस्वी प्रयोग झाला. कुटुंबाचा आधार बनलेल्या प्रमुखांची हेडसांड, कुष्ठरोग्यांची अवहेलना अन् वाळीत टाकणे या बहिष्कृतते बरोबरच स्वार्थ, प्रेम, छळ, शोषण, धोखा, फसवणूक या समस्यांना नाटकातून वाचा फोडली आहे. तद्वतच सूड,कटकारस्थानातून उद्भवणारे अग्नितांडव या विषयाला नाटककाराने प्राधान्य दिले आहे.
सातत्याने मागील वीस वर्षापासून झाडीपट्टी रंगभूमीवर अभिनय करणाऱ्या मुकेश गेडाम यांनी लिहिलेले विविध विषयांना न्याय देणारे सर्वसमावेशक स्वरूपाचे हे नाटक आहे.लावणी विरहित या नाटकातून महिला सुरक्षितता हा विषयही तिखट पुडी जवळ बाळगून सुरक्षा करण्याविषयीचा संदेश दिला आहे.
राजाराम सुभेदार यांनी प्रचंड परिश्रमाने अस्तित्व सिद्ध करीत कुटुंबास आर्थिक स्थैर्य निर्माण केले. सत्ता -संपत्तीने प्रतिष्ठित राजाराम यांनी प्रचंड संपत्ती मिळवली; परंतु नियतीच्या क्रूरतेने कुष्ठरोगासारख्या आजाराने ग्रासल्यामुळे कुटुंबियानी बहिष्कृत करीत अडगळीच्या खोलीत डांबले. पत्नी सगुना त्यांच्यावर अत्याचार करीत असे. अंधाऱ्या अडगळीच्या खोलीत डांबून त्यांना पाणी देत नसे, लाथाडत काठीने बेदम मारते. ‘परवशतेचा पाश गळा लागला…’ या संवादातून राजाराम आपल्या व्यथां प्रकर्षाने मांडतात. प्राजक्ताचे मुन्नावरील प्रेम , मुन्ना महिलांचा व्यापार करणारा दलाल असल्यामुळे तो तिच्या साधेपणाचा गैरफायदा घेऊन १० लाखात युसुफभाईशी सौदा करताना तिच्या लक्षात येते. तिथून ती मिरची पावडर फेकून सावधतेने बाहेर पडत त्याची तक्रार करते . परिणामी मुन्ना जेलमध्ये पाच वर्ष सजा भोगतो. इकडे प्राजक्ता प्रसादशी लग्न करून सुखी संसार थाटते .परंतु अपमानाचा बदला घेण्यासाठी मुन्ना प्राजक्ताच्या कुटुंबीयांचे हाल करण्यासाठी विविध कटकारस्थान रचून बरबाद करण्याकरिता अग्नितांडव करतो. ‘खुशियाल जिंदगीकी बरबादी ..एक ही मकसद ‘ , साध्य करण्यासाठी धडपडतो. त्याच्या जाळ्यात लालची सोनाक्षी अडकते . कंपनीच्या शेअर्स मधून प्रचंड पैसा मिळवावा या झटपट श्रीमंतीच्या लालचीपणामुळे ५० लाखाच्या गुंतवणुकीसाठी शेती व अधिक नफा मिळावा म्हणून राजारामवर जबरदस्ती करीत स्वाक्षरी घेऊन घरही कर्जासाठी गहाण ठेवते. राजारामचे हाल होत असताना मात्र सून प्राजक्ता काळजीने त्यांची सेवा करते .सासरा ही तिच्या पाठीशी ढाल बनून संकट प्रसंगी उभा राहतो. जगन्याने विष पेरल्यामुळे प्रसाद प्राजक्तावर बाहेरख्याली , व्यभिचाराचा आरोप करीत झिडकारून पेट्रोलने जाळण्याचा प्रयत्न करतो .रामराव यातून वाचवण्यास पुढाकार घेत तिचा चांगुलपणा विशद करतो.सावत्र आईच्या दुय्यमत्वच्या वागण्यामुळे व कटकारस्थानाने नैराश्यग्रस्त झालेला प्रसाद, जगन्याने भडकवल्यामुळे संशयाने वैफल्यग्रस्त होतो, पंगू होतो. प्रसाद -प्राजक्ताच्या बाळाला मुन्ना जाळून मारतो .शेवटी प्रसादचाही गळा आवळून खून करतो. शेवटी रणरागिणी बनत प्राजक्ता वेषांतर करून डॉली बनून येते. मुन्नाला दारूत गुंगीचे औषद पाजते, सुडाचा बदला घेते, पट्ट्याने वार करीत गळा आवळून त्याचाही खून करते. परंतु उत्तर प्रदेश पोलिसांकरिता वांटेड असलेला मुन्ना तिवारी यास पोलीस एन्काऊंटर करून संपवितात.मुन्ना तिवारी सारख्या दृष्ट गुंडांवर प्राजक्ताने युक्तीने मिळविला विजय एकंदर नाटकातून स्पष्ट होतो.
वडीलावर प्रचंड प्रेम असणारा, प्रामाणिक डोळस प्रसाद (निखिल मानकर), दुष्ट ,चतुर, कावेबाज सावत्र आई सगुना (वर्षा गुप्ते), पूर्व प्रियकराने धोका दिल्यानंतरही नवीन संसार उभा करणारी, कुष्ठरोगी असलेल्या सासऱ्यांची निस्सीमपणे सेवा करणारी डोळस प्राजक्ता (तेजस्विनी खोब्रागडे), दारुड्या नवऱ्यासोबतही आहे त्या परिस्थितीत आनंद शोधणारी दिलखुलास हजरजबाबी कोंमली (दीपाली भराडे),व्यसनाधीन पण हरहुन्नरी धनीराम (मा.गोपी रंधये), पैशाच्या लालचीपणामुळे कट-कारस्थानात सहभागी होणारा, भांडणे लावणारा तथा जडीबुटीच्या व्यवसायातून इतरांच्या जीवनात आनंद फुलविणारा विनोदवीर जगन्या (कल्लू शिंगरे) ,दुष्ट प्रवृत्तीचा मन मानेल तसा वागणारा आणि स्त्रियांना गोड बोलून प्रेम वश करीत बाहुपाशात अडकवून विक्री करणारा दलाल, व्यवसायावर फोकस करणारा गुंड मुन्ना तिवारी (मुकेश गेडाम), परिश्रमाने ऐश्वर्या संपन्न होऊनही केवळ कुष्ठरोगासारख्या असाध्य रोगामुळे परिवाराने वाळीत टाकलेला, बहिष्कृत जीवन जगणारा राजाराम सुभेदार (महेंद्र भिमटे) , पैशाच्या हव्यासापोटी गैरमार्गाचा अवलंब करणारा , सोनाक्षीला प्रेमाचे नाटक करीत मुन्नाच्या कटात सहभागी करून घेणारा पण वेळीच सावध होणारा निखिल चौधरी (डॉ.राज मराठे ),
लालचीपणामुळे कुटुंबाची वाताहत करण्यास जबाबदार असणारी, लवकरच दुसऱ्यावर विश्वास ठेवत शेत व घर गहाण ठेवणारी अन् मुन्नाच्या कटकारस्थानास बळी ठरणारी सोनाक्षी( शुभांगी राऊत ) या पात्राच्या माध्यमातून नाट्य विविध घटना- प्रसंगाद्वारे साकार होते. मुन्ना तिवारींनी अपमानाचा बदला घेण्यासाठी घडवलेला तांडव म्हणजेच हे नाटक आहे.छळ,दुर्लक्षितपणा, कटकारस्थान, व्यसनाधीनता, महिला सुरक्षितता असे अनेक विषय या नाटकाद्वारे दर्शविले आहेत.
नाटकातील गीत रचनाही वाखाणण्यासारखी आहे. झाडीपट्टीतील ठराविक पॅटर्नमध्ये असलेली लावणी या नाटकात नाही हे विशेष. ‘अधीर मन झाले ‘, ‘चांदण्या परी सखी रूप तुझे,” तुझी जवानी आरस पाणी’,’ जीव गुंतला तुझ्यात ‘,’दागिना घालीन सोन्यानं मडवीन,” होऊ दे स्पर्श तुझा ‘यासारख्या वैविध्यपूर्ण गीताने नाट्यप्रयोगात चांगलीच रंगत आणली. ‘…. उरला ना आधार..’ हे नाट्याशय अभिव्यक्त करणारे शीर्षक गीत , स्वरबहार निखिल मानकर यांचेश्रवणीय मधूर गायन नाटकाची मार्मिकता उलगडणारे व अंतर्मुख करणारे आहे. जय बावनथडे, पुरुषोत्तम दडमल, किशोर जोंधळकर यांची लाभलेली उत्तम संगीतसाथ गणेश साउंड सर्विसची ध्वनी व प्रकाश व्यवस्था, रमेश आर्टचे नेपथ्य यामुळे नाट्यप्रयोगात चांगलीच रंगत आली.
गोपी रंधये, दीपाली भराडे व कल्लू शिंगरे या त्रिकुट विनोदवल्लीच्या विनोदाच्या फवारणीने प्रेक्षक खुर्चीला कायम खिळून राहिला. अस्सल झाडीबोलीतील संवाद व बिनधास्त अभिनयशैलीमुळे दीपाली भराडे हिचा अभिनय अप्रतिम होता.
फोक्या ,ढलप्या , सपा , कई,जगझोडे, सुतावील, किरकार, टेंबा असे हास्योत्पादक वैशिष्ट्यपूर्ण शब्द व
पोरं करून देऊ का? , आगा मी होगा गा ‘ अशा विलक्षण वाक्याने प्रेक्षक खळखळून हसतच राहिला.
मोठ्या घरचा पोकळ वासा, वारा जाते भसाभसा’,
नाव सोनाबाई हाती कथलाचा वाळा’ ‘मूर्ख भोगीतो राजवैभवा पंडित फिरतो भिकारी, यासारख्या आशयगर्भ प्रभावी संवादाने नाट्यप्रयोगात परिणामकारकता आणली. मुन्ना तिवारी हा उत्तर प्रदेश पोलीसांचा वांटेड तडीपार कुख्यात गुन्हेगाराचे खल पात्र मुकेश गेडाम यानी हिंदीतील प्रभावी संवादाने व भारदस्त आवाजाने उत्तम साकारत प्रयोगात आणखीनच रंगत आणली.
नाटकातील विविध पात्रांच्या माध्यमातून समाजचिंतन व्यक्त करीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी ही नाटककाराने केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराच्या माध्यमातून’ स्त्री पुरुष रथाची दोन चाके ‘हा संदेश यशस्वीरित्या दिला आहे. स्त्री सक्षमीकरणाकरिता महिलांनी जवळ मोबाईल नाही बाळगले तरी चालेल ;परंतु मिरची पूड मात्र अवश्य बाळगली पाहिजे, असा मौलिक उपदेशही नाटकातून करण्यात आला आहे. विश्वास, नाते, आपुलकी, जिव्हाळा किंबहुना माणुसकी धर्म महत्त्वाचा हे एकूणच नाटकातून प्रत्ययास येते.
राजाराम सुभेदार या अभागी बापाची व्यथा, मुन्ना तिवारीचे सूडसत्र, प्राजक्ताचे आक्रंदन, निखिल चौधरीचे प्लॅन, सोनाक्षीचा स्वार्थीपणा आणि लालच, प्रसादची द्विधावस्था, रिपोर्ट, संशय,फाईल, सगुनाची दृष्टता, जगन्याचा लालचीपणा, कोंमली आणि धनीरामचा खटकेबाजपणा अनुभवण्यासाठी ‘अग्नितांडव’ हे नाटक पाहायलाच हवे.
प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली

