
भद्रावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : कोरोनाकाळात बंद करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांचे थांबे भांदक स्टेशनकरिता अजुनही पुर्ववत करण्यात न आल्याने शहरवासियांत नाराजी पसरली आहे. मध्य रेल्वे मुंबईचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांचे शुक्रवारी वरोरा रेल्वे स्थानकात आगमन झाले. यावेळी भद्रावती भीम आर्मीच्या वतीने निवेदन सादर करत भांदक रेल्वे स्थानकावरील गाड्यांचा थांबा पुर्ववत करण्याची मागणी करण्यात आली.
कोरोना काळा आधी मध्य रेल्वेच्या भांदक रेल्वे स्थानकात एक्सप्रेस तसेच सुपरफास्ट गाड्यांचा थांबा देण्यात आलेला होता. कोरोना संपल्यानंतर सर्वच गाड्या पुर्ववत सुरू करण्यात आल्या. मात्र भांदक येथील रद्द करण्यात आलेले रेल्वेचे थांबे अजुनही पुर्ववत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शहरवासियांत तीव्र नाराजी उमटलेली आहे.
भांदक रेल्वे स्थानकावर नवजीवन एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा, लोकमान्य टिळक – बल्लारशाह एक्सप्रेस या गाडीचा थांबा देण्यात यावा, चेन्नई – जयपूर, कोईम्बटूर – जयपूर, मैसूर – जयपूर या गाड्यांचा थांबा देण्यात यावा. तसेच नागपूर – बल्लारशाह मेमू पॅसेंजर ही नवी गाडी सुरू करण्यात यावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शुक्रवारी मध्य रेल्वे मुंबईचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांचे भांदक रेल्वे स्थानकावर आगमन होणार होते. मात्र ऐनवेळी भांदक रेल्वे स्थानकावरील त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. त्यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी वरोरा रेल्वे स्थानक गाठत जनरल मॅनेजर मीना यांची भेट घेत भांदक स्थानकावरील थांबा पुर्ववत करण्याची मागणी केली.
निवेदन देतांना भीम आर्मी भद्रावतीचे तालुका अध्यक्ष राजरतन पेटकर, तालुका संघटक अतुल पाटील, शहर अध्यक्ष थॉमस दुधे, शहर प्रभारी अजेंद्र ढोक, प्रणय कांबळे, बंटी रायपूरे, चंदन वाडेकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.














