अपमानाच्या बदलाचे सूड नाट्य: सुयोग नाट्य रंगभूमीचे ‘रुसली हळद लग्नाची’ नाटक

0
180

लेखक प्रा. राजकुमार मुसणे

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज 9168369784 – ध्रुव थियटर्स, देवा शेडमाके सर निर्मित, प्रा हरीश गेडाम लिखित विशाल तराळ दिग्दर्शित,सुयोग नाट्य रंगभूमी वडसा प्रस्तुत ‘संगीत ‘रुसली हळद लग्नाची ‘या नाटकाचा २२ वा प्रयोग जय श्री. माँ. भंडारेश्वरी नाट्यकला मंडळ दरूर आयोजित ११ फेब्रुवारी २०२५ ला प्रयोग यशस्वीरित्या संपन्न झाला. सुयोग नाट्य मंडळाचे यावर्षी रुसली हळद लग्नाची, हिजडा, जन्मदाता, हेच का माझं बाळ ही नाटके जोरात सुरू आहेत. कल्पक दिग्दर्शक विशाल तराळ व सकस कसदार अभिनय करणाऱ्या सर्व कलावंतांची ॲक्टीव्ह टीम तयार झाल्यामुळे मंडळाला विशेष मागणी झाडीपट्टीत आहे.
‘रुसली हळद लग्नाची’ हे नाटक सामाजिक व कौटुंबिक आहे.कॉलेजमध्ये आलेल्या नव-तरुणीवर पंचक्रोशीत धबधबा असलेला श्रीमंत विक्रम प्रेम करू लागतो. परंतु गरीब कुटुंबातील शिक्षणासाठी धडपडणाऱ्या आस्थाच्या मनात त्याच्याविषयी प्रेमाभिलाषा नसल्यामुळे ती धिक्कार करते. विक्रम आस्थाची छेड काढत टॉनटिंग करतो .त्यामुळे आस्था चा राग अनावर होतो ती विक्रमच्या गालावर थापड मारते. विक्रमला ही बाब खूप खटकते आणि त्याचा बदला घेण्यासाठी तो तिच्याशी प्रेमाचं नाटक करतो. आणाभाका घेतो, लग्नाविषयी चर्चा करतात.विक्रमच्या नावाची हळद आस्थाला लागते ,परंतु ऐनवेळी मात्र विक्रम आपलं खरं रूप दाखवतो आणि लग्नास नकार देतो. कॉलेजमध्ये गालावर चपराक मारल्याचा बदला म्हणून हे लग्न नाकारतोय .तुझं माझं लग्न होऊच शकत नाही दोघांचे संबंध तुटले असे विक्रम स्पष्ट बोलतो याचा परिणाम आस्थावर आणि त्याच्या वडिलांवर होतो .वडीलही गयावया करतात विक्रम दोघांनाही लाथडतो. हतबल वडील आणि चक्कर येऊन पडलेली मुलगी, शरमेने मान खाली गेल्याचे दुःख , बापाची केवीलवाणी धडपड, आस्था ओढणीने गळफास घ्यायचा प्रयत्न करते, देवा येऊन तिला त्यातून वाचवतो शेवटी वडील शंकरच्या आर्ततेमुळे देवा आस्था सोबत लग्न करण्यास तयार होतो. शंकर लोहारला पैशाची आवश्यकता असते तो विक्रमकडे कर्ज मागायला जातो. एक महिन्याची मुदत संपल्यानंतर मात्र तो वाद करतो मारहाण करतो आणि या चाकू हल्ल्यात दीपकचाही मृत्यू होतो.विक्रम देवाच्या नावाची हळद अंगाला अन् बाशिंग कपाळाला बांधू देणार नाही म्हणून खडसावतो . चिडलेली आस्था त्याच्या गालावर थापट मारते अन् कलह निर्माण होतो . शंकर कुऱ्हाडीने विक्रमला मारत असतानाच श्यामने देवाचा मृत्यू झाल्याचे सांगताच या धक्क्याने शंकर दगावतो.जत्रा, हातावर नाव गोंदवणे , मुलीचे अपहरण करणे, चावडीवर मिळालेल्या देवा आणि दीपक या दोनअनाथांना गरीब शंकर लोहार आश्रय देत संगोपन करणे,नयनाने नंदाला नाचायला नकार देणे, नयनाने नंदाला मारणे ,देवा विक्रमला मारणे, नयनाच्या धाडसामुळे नंदाला अटक होणे. या घडामोडीतून नाट्य परिणामकारकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले जाते.’दोन ध्रुवावर दोघे आपण…’प्रसिद्ध ओळींच्या संयुक्त उपयोजनामुळे नाट्यात परिणामकारकता आली.
गरीब पण माणुसकी धर्म निभावणारा, स्वाभिमानी, कुटुंबवत्सल शंकर लोहार (मा. वासू कुमार), मुलीच्या अपहरणाने सर्वस्व गमावल्याच्या दुःखाने मनोरुग्ण झालेला श्यामा (के.रवीकुमार), पंचक्रोशीत दबदबा असलेला, मनमानी, गुंड प्रवृत्तीचा ,मवाली , आपल्याच धुंदीत जगणारा व्यसनी, चॉकलेट व्हिलन श्रीमंत विक्रम पांडे (सिने. विशाल तराळ), अनाथ असल्याने आश्रय देणाऱ्या शंकर लोहारांच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने मदत करणारा सच्चा दिल इन्सान देवा (सागर सहारे), समन्वयवादी वृत्तीचा दीपक (स्वरबार अभिजीत शेंडे), लालची, स्त्री लंपट, लग्नासाठी आसुसलेला देवीलाल सेठ (कॉमेडी किंग पी. लालचंद), कायम तोतडे बोलणारा विनोदवल्ली भोला (विकास गुरनुले ), पैशाची लालची कामिनी, हट्टी , लालची (सिने. शोभा शितोळे), ध्येयवादी, उपक्रमशील ,धडपडणारी प्रेमळ, सहनशील आस्था (भूमिका दुपारे), नृत्याचा आविष्कार घडविणारी पण प्रसंगी डोळे उघडताच विद्रोह करीत नंदाला धडा शिकवणारी नयन (प्रीती मरसकोल्हे), सबसे बडा रुपया म्हणणारी लालची नंदाबाई (नयना ), इन्स्पेक्टर (बाळू कावडे) या पात्रांच्या माध्यमातून’ रुसली हळद लग्नाची ‘हे नाट्य साकार होते.
रुसली हळद लग्नाची ‘या नाटकातील गीतेही बहारदार आहेत. स्वरबहार अभिजित शेंडे यांनी गायलेले ‘अनुभवलेला क्षण तो सुखाचा’,’कलियुगी हा खेळ असे दैव गतीचा’, पडझड झाली आयुष्याची’, डोळ्यात पाणी आटते काळीज माझे फाटते’, हाती घेऊन आई दोरी पाळण्याची झोपी जाई छकुला झुपके सुखाची’, हे अंगाई गीत ,रुसली हळद लग्नाची काय करावे काही सूचना वेळ टाळी लग्नाची ‘, श्रावणाच्या त्या चिंब पावसात तू अन मी दोघे हिरव्या वनात’, ओठो पे लाली बालो मे गजरा’ यासारख्या श्रवणीय गीतातून नाटकातील आशय व्यक्त होतो . गायकांचे सुमधुर स्वरातील गायन आणि आर्गन राहुल सहारे, तबला बाळू कावळे ,ऑक्टोपॅड सुनील मोहूर्ले,ध्वनी व प्रकाश व्यवस्था गणेश साऊंड सर्विस जवराबवाडी नेपथ्य प्रयोगास सहाय्या ठरले.
झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकातील विनोद हा आत्मा आहे.या नाटकातील विनोदही महत्त्वपूर्ण आहे.
‘हात नाही लावलं बोट नाही लावलं तरी पोट आल्यावानी करते’. पूजा, घंटा, कुंवारपण, थूतरतोंडे, तोतळा ,खिसा फाटला ,नाव भोला कोटी नेऊन घाला, माझ्याकडे बघते ,झेंडा फडकवणे, डालका, वाक्याची मुळी अशा विलक्षण शब्दाच्या उच्चारणाने विनोद निर्माण होत प्रेक्षक हसायला लागतात. भोला- विकास गुरनुले यांच्या तोतरेपणामुळे निर्माण झालेले पेचप्रसंग पाहून प्रेक्षक हसून लोटपोट होतात.
एकंदरीत खोटे प्रेम, हुंडा, मुलींचे (छकुलीचे) अपहरण, देहविक्रय, कोटीवर नृत्य करण्यास प्रवृत्त करणे ,छळ ,फसवणूक, अपमान, बदला व निराधारांना आश्रय इत्यादी विषय या नाटकातून मांडलेले आहेत. शिवाय अनाथ मुलाचा सांभाळ करणारा शंकर लोहार, मुलगी हरवल्यामुळे पागल झालेल्या श्यामा या पात्राच्या माध्यमातूनही समाजातील प्रश्न चर्चिले आहेत. विषय सामान्य असला तरी मात्र कसदार कलावंतांच्या अभिनय संपन्नतेमुळे व कल्पक दिग्दर्शक विशाल तराळ यांच्या उत्तम दिग्दर्शनामुळे नाट्य प्रयोग यशस्वी ठरला.

लेखक – प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here