
ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. 24/4/025 – भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार ‘राष्ट्रीय पंचायत राज दिना’निमित्त ठाणे जिल्हा परिषदेच्या 431 ग्रामपंचायतींत विशेष ग्रामसभा व जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच जिल्हास्तरावर देखील या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
जिल्हा स्तरावरील मुख्य कार्यक्रम बी. जे. हायस्कूल, ठाणे येथे पार पडला, ज्यामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रकल्प संचालक श्रीमती छायादेवी शिसोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यक्रम अधिकारी संजय बागुल, ग्राम विकास अधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या विशेष उपक्रमांमध्ये पुढील बाबींचा समावेश होता:
– ४३१ ग्रामपंचायती ग्रामस्तरावर विशेष ग्रामसभा
– स्वच्छता उपक्रम अंतर्गत कम्युनिटी मोबिलायझेशन
– महिला स्नेही ग्रामपंचायत, स्वामित्व, पेसा, वन हक्क कायदा यासह योजनांचे साहित्य प्रदर्शन
– उत्कृष्ट ग्रामपंचायती, प्रतिनिधी व संस्थांचा सत्कार
– मा. पंतप्रधान यांचे देशाला संबोधनाचे थेट प्रसारण
कार्यक्रमाच्या आधी जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांनी एकत्र येऊन स्वच्छता अभियान राबवले, ज्यामध्ये कार्यालय परिसर स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे म्हणाले, “जिल्हा परिषद ठाणेच्या यशस्वी वाटचालीसाठी सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्यपातळीवरील विविध पुरस्कारांचा मान हा त्यांच्या संयुक्त प्रयत्नांचा परिणाम आहे. आपल्या कार्यातून जिल्हा राज्यात अग्रस्थानी राहील, यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया.”

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे यांनी ग्रामपंचायतींना स्वायत्ततेचा अधिकार मिळाल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी बदल माहिती दिली. लोकशाही प्रक्रियेतील नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व प्रास्ताविक करताना अधोरेखित केले.
पारितोषिक वितरण:
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात “माझी वसुंधरा अभियान 4.0 (2023-24)” अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना गौरविण्यात आले. यामध्ये भिवंडी तालुक्यातील काल्हेर, शहापूर तालुक्यातील वासिंद व बाभळे, तसेच मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण या ग्रामपंचायतींचा समावेश होता. संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सन्मानामुळे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन मिळाले असून इतर ग्रामपंचायतींसाठीही हे एक प्रेरणास्थान ठरले आहे.
या कार्यक्रमाद्वारे ग्रामीण स्तरावरील निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता आणि ग्रामस्थांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.














