
छत्रपती संभाजीनगर येथे कक्कय्या समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची तात्काळ स्थापना करावी या मागणीसाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. ही भेट मंत्री शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी झाली.
या वेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनापंत कावळे, शिवसेना महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख तथा माजी नगरसेविका लक्ष्मी नरहिरे यांच्या नेतृत्वाखाली समाजाचे अनेक प्रतिष्ठित बंधू-भगिनी उपस्थित होते. कक्कय्या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसंबंधी निवेदन मंत्री शिरसाट यांना देण्यात आले.
या वेळी संत कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा मागील वर्षी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती, याची आठवण करून देत त्याची व्हिडीओ क्लिपही दाखवण्यात आली. अनेकदा पाठपुरावा करूनही अद्याप शासन निर्णय (जीआर) निघालेला नसल्यामुळे समाजात असंतोष आहे. त्यामुळे दिनांक 7 जुलै 2025 रोजी मुंबई येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री महोदयांना देण्यात आली.

या निवेदनाच्या अनुषंगाने मंत्री संजय शिरसाट यांनी तत्काळ बैठक आयोजित करण्याचे निर्देश आपल्या सचिवांना दिले आहेत. तसेच कालच मुंबई येथील त्यांच्या दालनात वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ, मुंबईचे अध्यक्ष महादेव कृष्णा शिंदे व सचिव यशवंत नारायणकर यांनी भेट घेतल्याची माहितीही मंत्री महोदयांनी दिली.
या भेटीचे आयोजन करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या लक्ष्मी किरण नरहिरे यांनी विशेष सहकार्य केले. निवेदन देताना बाबासाहेब इंगोले, दिलीप इंगळे, अशोक जाधव, शिवाजी कावळे, संतोष मुनेमानिक, परशुराम पाटेकर, हनुमान सोनटक्के, अशोक (दाजी) सोनटक्के, रेखाताई फुलवरे, प्रभुजी फुलवरे, शिवाजी खरात व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
किरण नरहिरे यांनी सर्वांचे आभार मानत कक्कय्या समाजाच्या वतीने मंत्री संजय शिरसाट यांना कक्कय्या समाजाचे आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर स्थापन करावे, अशी विनंती केली.















