prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – शिक्षक दिन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – शिक्षक दिन

0
192

व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो. शिक्षक ते नाहीत जे विद्यार्थ्यांच्या डोक्यात तथ्य जबरदस्ती थोपतात, शिक्षक तर ते असतात जे विद्यार्थ्यांना येत्या काळातील आव्हानासाठी तयार करतात. ‘शिक्षक दिन’ हा आपल्या जीवनात शिक्षकाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी साजरा केला जातो, वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या व्यक्तीचा वेगवेगळ्या तारखेला शिक्षक दिन साजरा होतो. भारतात हा दिवस आपल्या भविष्याला घडवण्यात शिक्षकांच्या महत्वपूर्ण भूमिकेची आठवण करुन देतो.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारत सरकारचेच त्यांचा जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याचे आदेश आहेत. जो शिकवण देतो तो गुरू, याप्रमाणे गुरूचे स्थान वैदिक काळ, बुद्ध काळापासून आहे. गुरु शिष्य परंपरा ही भगवान बुद्धांच्या काळापासून प्रचलित आहे. तसे आपले आई वडिल सुध्दा आपले गुरू असतात.
शिक्षक हे राष्ट्राचा कणा आहेत. ते आपल्याला केवळ ज्ञानाने शिक्षीत करत नाहीत तर शिस्त, नैतिक मूल्ये आणि चरित्र विकसित करण्यात देखील मार्गदर्शन करतात. शिक्षक आपल्याला आपल्या सभोवतालचे जग समजून घेण्यास मदत करतात, आणि मोठी स्वप्ने पाहण्यास आणि आपली ध्येय साध्य करण्यास प्रोत्साहित करतात. शिक्षक हे डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ, कलाकार आणि नेते घडवतात.
शिक्षण हा वैयक्तिक आणि सामाजिक विकासाचा आधारस्तंभ आहे. आणि शिक्षक हे या परिवर्तनाच्या प्रकियेमागील प्रमुख शक्ती आहेत. ज्ञान हे ग्रंथ, दैनिके, नियतकालिके, साप्ताहिके, मासिके, संगणक, दृकश्राव्य यामध्ये साठविलेले असले तरी गुरु शिवाय ते मिळणे अशक्य आहे. यासारखी शैक्षणिक साधने अत्यावश्यक असली तरी शिक्षक हा प्राथमिक घटक म्हणून काम करतो, ज्याद्वारे ज्ञान आणि कौशल्य दिली जातात. शिक्षकाची भूमिका माहिती देण्यापलीकडे आहे. ते मार्गदर्शक, प्रेरक आणि सुविधा देणारे आहेत जे आजच्या मुलांना शिक्षित करून भविष्य घडवितात. शिक्षण सुलभ करण्यात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षणाच्या केंद्रस्थानी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद असतो. ते विविध शिक्षण शैली आणि गरजा पुर्ण करणारे धडे तयार करून शिकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करतात. विद्यार्थी शिक्षकाकडून जटिल संकल्पना समजून घेतात. गंभीर विचार विकसित करतात. शिक्षक ज्ञान प्रभावीपणे लागू करतात. याची खात्री करण्यासाठी ते विविध शैक्षणिक धोरणे वापरतात. ते विद्यार्थ्यांच्या जिज्ञासाला प्रोत्साहन देतात, आणि त्यांच्या प्रश्नांचे नेहमी स्वागत करतात.
शिक्षक नेहमी मार्गदर्शकाची भूमिका वटवितात. ते अनेकदा मार्गदर्शक म्हणून काम करतात. शिक्षणाच्या प्रवाहात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्याहीपलीकडे ते वैयक्तिक आणि सामाजिक विकासावर सल्ला देतात. विद्यार्थ्यांना आव्हाने स्वीकारण्यास आणि चारित्र्य निर्माण करण्यास मदत करतात. त्यांचा प्रभाव चिकाटी, सचोटी आणि सहानुभूती यासारख्या मुल्यांना वाढवितो. समर्थन आणि प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण करतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संबंध हा शैक्षणिक अनुभवाचा एक मूलभूत पैलू आहे. सकारात्मक, आश्वासक संबंध शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये वाढू शकतात. मजबुत आणि विश्वासार्ह संबंध वाढू शकतात. तशा प्रकारचे वातावरण शिक्षक निर्माण करु शकतात. हा भावनिक आधार विद्यार्थ्याच्या कामगिरीवर आणि कल्याणावर लक्षणिय परिणाम करू शकतो. शिक्षक तथ्यात्मक ज्ञान करण्याबरोबरच विद्यार्थ्याच्या कौशल्याचा विकास करण्यावर भर देतात. यामध्ये समस्या सोडविणे, विश्लेषणात्मक विचार आणि प्रभावी संवाद सामाविष्ट आहे. विद्यार्थ्याना सर्जनशीलपणे विचार करण्यास भाग पाडतात. त्यांचे ज्ञान व्यावहारिक मार्गाकडे वळवितात. बदलत्या शैक्षणिक गरजांशी जुळवून घेण्याची क्षमता शिक्षकात असली पाहिजे, शिक्षकाला त्याची भूमिका स्थिर ठेवता येत नाही. हे शैक्षणिक मानके, तंत्रज्ञान आणि सामाजिक गरजामधील बदला सहित विकसित होत असते. विद्यार्थ्याना आधुनिक शिक्षण देतात.
खरोखरच शिक्षक शिक्षणाचा आधारस्तंभ आहेत. ते शिक्षणाचा प्राथमिक स्त्रोत म्हणून काम करतात. ते पुढील पिढीवर प्रभाव टाकून प्रेरणा देतात. मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थ्याचे भविष्य घडवितात. विद्यार्थ्याच्या बौद्धिक आणि वैयक्तिक वाढीवर शिक्षकांचा सखोल प्रभाव पडणे हे समाजासाठी फार मोठे योगदान आहे. एकविसाव्या शतकात आपण पुढे जात असताना सुशिक्षित आणि सक्षम समाज घडविण्यासाठी शिक्षकाची भूमिका नेहमीच महत्वाची असते.
शिक्षक हा शिक्षणाचा स्रोत यामध्ये शिक्षण सुलभ करण्यासाठी वापरल्या जाणारी अनेक स्त्रोत उपलब्ध आहेत. शिक्षक त्याचा उपयोग करतात. पाठ्यपुस्तके आणि वाचनिय साहित्य, डिजिटल उपकरणे, ऑनलाईन साधने, शैक्षणिक ॲप्स, टॅब्लेट, स्मार्टफोनचा समावेश होतो. शैक्षणिक सॉफ्टवेअर मध्ये विशिष्ट विषय, कौशल्याचे डिझाईन केलेले प्रोग्राम असतात. मल्टिमीडिया जसे ऑडियो व्हिडिओ पाहण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्याना प्रोत्साहित करतात. ऑनलाईन मध्ये वेबसाइट्स, गूगलचा उपयोग होऊ शकतो. गटचर्चा, सेमिनार, इत्यादी माहितीचे साधने आहेत.
शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान तसेच जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्या नंतर सात आठवडे त्यांनी पिंपळवृक्षा खाली घालविले. नंतर जगातील अज्ञान दुर करण्यासाठी त्यांनी त्या ज्ञानाचा प्रचार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना प्रथम गुरुस्थानी मानले. त्यांचे इतरही दोन गुरु होते. ते म्हणजे संत कबीर आणि महात्मा फुले होत. आधुनिक काळात खरे शिक्षणाचे महत्त्व समाजाला महात्मा फुले यांनी पटवून दीले. त्यानंतर पहिल्या महिला शिक्षीका सावित्रीबाई फुले झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा कायदा करून सर्वांना संवैधानिक अधिकार दिले.
आज शिक्षणाचे अवमूल्यन होत आहे. गुरुच्या प्रती पवित्र भावना लोप पावत आहेत. आपल्या गुरुच्या स्मूर्ती कायम ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा करणे आवश्यक आहे. भविष्यातील विचारवंत, कलाकार, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये आहे. शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत तर जीवन जगण्याची कला शिकवतात. आपल्या व्यक्तिमत्त्वावर शिक्षकाकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालिरीती, आदर असे पैलु पाडले जातात. त्यामुळे आपण आपल्या गुरुंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे.
भगवान बुद्ध केवळ भिक्षुचे गुरु नव्हते, कोणी गृहस्थ असो वा भिक्षु, कोणी राजा असो वा रंक, श्रीमंत असो किंवा गरीब, विद्वान असो किंवा अशिक्षित, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असो किंवा अतिशूद्र, कोणत्याही प्रदेशातील असो, कोणतीही बोलीभाषा बोलणारा असो, लहान असो की मोठा, स्त्री असो की पुरूष असा भेदभाव त्यांनी केला नाही. त्यांची शिकवण सर्वांकरीता होती. याला म्हणतात जगतगुरु. भगवान बुध्द वयाच्या सोळाव्या वर्षी विवाहबद्द झाले. वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. विवाह ते गृहत्याग या तेरा वर्षाच्या जीवनात त्यांनी अनेक गोष्टीचा अनुभव घेतला, त्याहीपेक्षा सहा वर्षे खडतर तपस्यानंतर ते सम्यक संबुद्ध झाले. त्यानंतर धम्मप्रचार करतांना लोकसंग्रह मोठ्या प्रमाणात वाढला. त्यांनी लोकांना धम्मजीवन जगण्याचा उपदेश दिला. त्यांनी सर्वच प्रकारच्या लोकांना, संप्रदायाना उपदेश दिला. भगवान बुद्धांचा लोकसंग्रह फार मोठा होता. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना सद्धम्माचे यशस्वी जीवन जगण्याचे उपदेश त्यांनी दिले. त्यामुळे भगवान बुध्द जागतिक धम्मगुरू ठरले.

प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here