
दोन स्कूटींचा चक्काचूर, दोन बालिका थोडक्यात बचावल्या
बल्लारपूर :- गांधी चौक परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण घटनेत एका जीर्ण इमारतीची भिंत कोसळून दोन दुचाकी, मलब्यात दबल्या. सुदैवाने दोन बालिका अवघ्या काही सेकंदांनी तिथून निघून गेल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत अनुदीप ज्वेलर्सचे संचालक अन्नू मातंगी यांच्या दोन दुचाकी क्रं. एम एच ३४ ए झेड ७१५८ व एम एच ३४ एवाय ०६७० भिंतीच्या मलब्यात दबल्या. स्थानिक व्यापारी सुरेश गुप्ता यांच्या मालकीची सुमारे शंभर वर्षे जुनी इमारत शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास कोसळली. भिंत कोसळताना मोठा आवाज होताच परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी जमा झाले. सुरेश गुप्ता यांना फोनवर माहिती देण्यात आली. भिंत कोसळतानाच दोन लहान मुली तिथून अवघ्या पाच सेकंदांपूर्वी निघून गेल्याने गंभीर दुर्घटना टळली. गांधी चौक परिसरातील ही इमारत जीर्ण अवस्थेत असून, मालक कुटुंब सध्या बामणी येथे वास्तव्यास आहे. तरी देखील काही कुटुंबे इमारतीच्या खालच्या भागात राहत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले.















