prabodhini news logo
Home चंद्रपूर १०० टक्के उद्दिष्ट गाठत मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना यशस्वी करा –...

१०० टक्के उद्दिष्ट गाठत मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना यशस्वी करा – आ. किशोर जोरगेवार

0
82

उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक

उज्वला नगराळे महिला जिल्हा संपादिका प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ पाणंद रस्त्यांनी युक्त करण्याचा आपला ठाम संकल्प असून मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी पायाभूत सुविधा सक्षम केल्या जाणार आहेत. मात्र या योजनेचा खरा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागांमध्ये समन्वय साधत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या.
मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात शुक्रवारी उपविभागीय कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले, तहसिलदार विजय पवार, नायब तहसीलदार राजु धांडे, गट विकास अधिकारी संगीता भांगडे, वन परिक्षेत्र अधिकारी जि. आर नायगमकर, एस. व्ही मव्हेशंकर, उपकृषी अधिकारी व्ही. बी बुग्गेवार, महसुल अधिकारी व्ही.एम कुरेवार, के. टी मोडकवार, प्रविणकुमार वर्भे, विनोद गणफाडे, प्रकाश सुर्वे, भुकरमापक व्हि.डी राठोड, तलाठी, एस. एन दुर्गे, एस. आर नगराळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे के. एस आश्राम, यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, शेतकर्यांना थेट शेतापर्यंत पोहोचता यावे, शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात दर्जेदार आणि उपयोगी रस्ते तयार झाले पाहिजेत, याकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे.
यावेळी आमदार जोरगेवार यांनी विविध विभागांना ठोस सूचना दिल्या. वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने पाणंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करावे, अतिक्रमित पाणंद रस्ते मोकळे करावे, तसेच ग्रामपंचायतींकडून आवश्यक प्रस्ताव मागवावेत, असे त्यांनी सांगितले.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने आतापर्यंत झालेल्या कामांची स्वतंत्र छाननी करावी, सध्या किती पाणंद रस्ते प्रत्यक्ष वापरात आहेत याचे सर्वेक्षण करावे आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन नियोजनबद्ध आराखडा तयार करावा, अशाही स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यवाही, विभागनिहाय जबाबदारी निश्चित करणे आणि नियमित आढावा घेण्यावर भर देण्यात आला. पाणंद रस्ते म्हणजे केवळ रस्ता नाही, तर शेतकर्याच्या कष्टाला बाजारपेठेपर्यंत पोहोचवणारा मार्ग आहे. त्यामुळे दर्जेदार काम, योग्य नियोजन आणि वेळेत अंमलबजावणी यावर भर दिला पाहिजे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मी स्वतः नियमित आढावा घेणार आहे. चंद्रपूर मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभार्थी झाला पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here