
वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर
चंद्रपूर :- कालच्या रात्री समृद्धी महामार्गावर बुलढाणा जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात २५ निष्पापांचा जळुन वेदनादायी मृत्यू झाला. मृतकांची राख थंडीही झाली नसेल आणि संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या सावटाखाली असताना महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सरकारातील मंत्री या दुःखात सहभागी राहुण मृतकांच्या कुटुंबासोबत असायला पाहिजे. परंतु सत्तेचा माज असणाऱ्यांनी सत्तेच्या खुर्चीच्या चढाओढीत महाराष्ट्रावर आलेल्या एवढ्या मोठ्या दुःखाला बाजूला करून राजकीय भूकंपाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनेशी खेळून आज अजित पवार व राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे मंत्री, शिवसेनेचे मंत्री निर्लज्जपणे शपथ सोहळ्याला उपस्थित होते. मागील पाच वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी खेळून एक गलिच्छ राजकारण करुन महाराष्ट्राचा सत्यनाश करण्यात येत आहे.आज महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा भिषण अपघात झाला त्याची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता उपाय योजना करणे ऐवजी सत्तेसाठी पिसाळलेल्या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी सत्तेचा बाजार मांडून पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालवली. या राजकीय नाट्याचा जाहीर निषेध करून येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना सद्बुद्धी येवो हे ईश्वराजवळ प्रार्थना करतो असे प्रसारमाध्यमांशी बोलताना उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील शपथविधी बद्दल नाराजी दर्शवली.














