आधार केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी,जनतेची मागणी
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे आधार केंद्रावर नेहमीच गर्दी असते. येथे एकच आधार केंद्र असल्यामुळे नागरिकांना आधार अपडेट करायला २ ते ३ दिवस चकरा माराव्या लागतात. यामुळे परिसरातील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नवरगावची ओळख आहे. या गावाची लोकसंख्या जवळ पास १५ हजाराच्या वर आहे.नवरगांव परिसरात येथे एकच आधार केंद्र देण्यात आला आहे.त्यामुळे आसपास च्या सर्व गावातील लोक या आधार केंद्रा वर येत असतात. आधारकार्डावरील दुरुस्त्या करणे,अपडेट करने, गरजेचे झाल्याने आधार केंद्रावर नेहमीच गर्दी असते.विविध योजनेच्या कामकाजात आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक झाले आहे. आधार अपडेटसाठी शाळेतील मुले, महिला, पुरुषांची आधार केंद्रावर कामकाजासाठी गर्दी होत असल्याने नवरगावात लोकसंख्येचा विचार करून आधार केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

