दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल अर्थसंकल्प देशाला विकासाची नवी दिशा देणारा आहे. उद्योग, ग्रामीण विकास, रोजगार, सुरक्षा या विषयांना केंद्र स्थानी ठेवून सदर अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाचा नवा अध्याय असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे.
यावर बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून स्टार्टअप्स आणि रोजगार निर्मिती उपक्रमांवर दिलेला भर ही एक चांगली बाब आहे. अनेक क्षेत्रांमधील व्यवहार सुलभ करण्यात आले आहेत. सर्वच क्षेत्रांमधील भविष्यातील सुधारणांचा आढावा या अर्थसंकल्पात असून उद्योग विश्वासाठी हा एक महत्त्वाचा संदेश आहे.पूरस्थिती नियंत्रणासाठी साधारणपणे ११ हजार ५०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजना २.० अंतर्गत १ कोटी गरीब व मध्यम वर्गीयांच्या घरासंदर्भातल्या गरजा भागवण्यासाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर करण्यात आली आहे. यातून १ कोटी घरांना प्रत्येक महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.
कृषी क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण आदी क्षेत्रावर अर्थसंकल्पात अधिक भर देण्यात आले असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

