प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – महायुती शासनाने पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर ओबीसी, विशेष मागास प्रवर्गातील गरीब -गरजु नागरीकांना घरकुलाचा लाभ मिळावा याकरिता महत्वाकांक्षी मोदी आवास घरकुल योजना सुरू केली. आरमोरी मतदार संघासह गडचिरोली जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना सदर योजनेतून घरकूल मंजूर करण्यात आले. मंजुरी अंती या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले. अनेक लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले तर काहींचे बांधकाम सुरू आहे. सदर लाभार्थ्यांपैकी अनेकांना पहीला किंवा दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळालेले आहे. परंतु अनुदान अप्राप्त असल्याने अनेकांची आर्थिक कोंडी होऊन त्यांना बांधकाम साहित्य, बांधकाम मजुरांची मजुरी देताना प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याची बाब आमदार कृष्णा गजबे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुलजी सावे व राज्याचे उपमुख्यमंत्री व गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मोदी आवास घरकुल योजनेच्या घरकूल लाभार्थ्यांची व्यथा त्यांचे निदर्शनास आणून देत निवेदनाद्वारे मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने उर्वरित टप्प्यातील अनुदान उपलब्ध करण्याची मागणी केली.
सदर मागणीच्या अनुषंगाने आज दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने त्यांना वित्त विभागाने उपलब्ध करून दिल्या प्रमाणे संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, यांना ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला होता. परंतु लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता संपूर्ण राज्याची जवळपास १२०० कोटी रुपयांची मागणी असल्याने उपलब्ध निधीतून घरकुल लाभार्थ्यांना पुरेसा दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे निदर्शनास आल्याने आमदार कृष्णा गजबे यांनी शासनाने अधिक निधी उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्या मागणीमुळे आता इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने दि. २४ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार ७५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.
त्यामुळे लवकरच मोदी आवास घरकुल योजनेच्या जवळपास सर्वच लाभार्थ्यांना उर्वरित टप्प्यातील अनुदान मिळण्यास मदत होईल. आमदार कृष्णा गजबे यांनी मोदी आवास योजनेच्या घरकूल लाभार्थ्यांना भरघोस निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व नामदार अतुलजी सावे यांचे आभार मानले आहे.

