विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर – महाविकास आघाडी सरकार काळात विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे करिता राज्याचे तत्कालीन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. या योजनेतून अनेक लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळाले. तर आज विरोधी बाकावर बसूनही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून शासन स्तरावर मागणी भेटून धरल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील एकूण ४४७ घरकुलांना मंजूरी मिळाली. यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
समाजातील हातावर आणून पानावर खाणे अशा प्रचंड संघर्ष जीवन जगणाऱ्या भोई समाजाला आजवर कुठल्याही योजनेमार्फत हक्काचे घर मिळाले नाही. तर पोटाची भूक भागविण्यात संपूर्ण मिळकत खर्च होत असल्याने तसेच बचत शिल्लक राहत नसल्याने फार विवंचनेच सापडलेल्या या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून या समाजाचा सर्वांगीण विकास साधावा या उदांत हेतूने महाविकास आघाडी सरकार काळात राज्याचे तत्कालीन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ता काळात समाजातील दुर्बल घटकांकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंमलात आणली. सदर योजनेमार्फत राज्यातील लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला व त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. यात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील हजारोच्या संख्येने लाभार्थ्यांचा सहभाग आहे. मात्र मागील वर्षी उद्दिष्ट पूर्तीत काही तांत्रिक अडचणी व कागदी त्रुट्यांमुळे जे लाभार्थी अपात्र ठरले व ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा अपात्र व गरजू लोकांना हक्काचे घरकुल मिळावे याकरिता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांनी चालवलेल्या प्रयत्नांना आज फलश्रुती मिळाली असून ब्रह्मपुरी तालुक्यात ४४७ नव्याने घरकुलांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे . सत्ता काळ ते विरोधी बाका पर्यंत च्या प्रवासात सर्वसामान्यांची नाळ जुळून असलेला नेता म्हणून सर्व दूर परिचित असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळणार असून त्यांच्या या यशाच्या फलश्रुतीमुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

