
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माळ गावात काल एक हृदयद्रावक घटना घडली. तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला करून त्यांचा जागीच मृत्यू केला. या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि शोकाचे वातावरण पसरले आहे.
वाघाच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या महिला म्हणजे कांता बुधाजी चौधरी (वय ६५), शुभांगी मनोज चौधरी (वय २८) आणि रेखा शालिक शेंडे (वय ५०) या होत. आज त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहून त्यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पण केली आणि शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले.
या कठीण प्रसंगी चौधरी आणि शेंडे कुटुंबांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
ही घटना केवळ दुःखदच नव्हे, तर अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्रात प्रथमच एका वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा एकत्र बळी गेल्याची घटना आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे, प्रभावी गस्त वाढवणे आणि वनक्षेत्रांमध्ये सुरक्षा यंत्रणा सक्षम करणे अत्यावश्यक आहे. शासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन मोठ्या स्तरावर योग्य ती कारवाई करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.















