Prashant Ramteke chief Editor Prabodhini News – भद्रावती तालुक्यातील आदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनखेडा ग्रामपंचायतीत सध्या ग्रामविकासाऐवजी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, सरपंच नयन जांभुळे यांच्याविरोधात ग्रामस्थांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, जांभुळे हे दररोज मद्यपान करतात आणि ग्रामपंचायतीतही दारूच्या नशेतच येतात, ही बाब अनेकदा ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम करत आहे. विशेष म्हणजे, वर्षाच्या 12 महिन्यांपैकी जवळपास 9 महिने ते व्यसनमुक्ती केंद्रात राहतात, यामुळे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात अडथळे येत आहेत. याचा फटका सर्वसामान्य गावकऱ्यांना बसत आहे.
सध्या पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत शेतीचे संभाव्य नुकसान किंवा कोणतेही आपत्कालीन प्रश्न निर्माण झाल्यास ग्रामस्थांनी मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी कुणाकडे जावे? हा प्रश्न उभा राहिला आहे.
गावातील जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता असून, सरपंच पदावर मुलभूत जबाबदाऱ्या पार न पाडणाऱ्या व्यक्तीला ठेवण्यात काहीही अर्थ नाही, असे मत ग्रामस्थांनी स्पष्टपणे मांडले आहे. त्यामुळे सरपंच श्री. नयन जांभुळे यांना तात्काळ पदमुक्त करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
गावाचा विकास आणि नागरिकांच्या हितासाठी सक्षम व जबाबदार नेतृत्वाची गरज आहे, याची जाणीव आता संपूर्ण चंदनखेडा गावाने घेतली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

