
वातीचा एक श्वासही जळतो,
जसा प्रत्येक थांबलेला आवाज पुन्हा पेटून उठतो…
आजही काही वाती त्या देव्हाऱ्यात फक्त पूजा म्हणून नाही, तर
क्रांतीचे प्रतीक म्हणून दररोज जळत आहेत.
ती वात… कधी शिवरायांच्या स्वराज्य संकल्पाची बनते,
तर कधी डॉ. बाबासाहेबांच्या समतेच्या रणभेरीची.
शिवरायांनी स्त्रियांना केवळ अब्रूचं नव्हे तर
एक स्वतंत्र अस्तित्व दिलं.
राण्यांच्या भुमिकेपासून मावळ्यांच्या मातेपर्यंत
स्त्री ही त्यांनी समाजाच्या मध्यभागी उभी केली.
“जिथे स्त्रियांना सन्मान मिळतो, तिथे देव वास करतो”
हे तत्व त्यांनी त्यांच्या राज्यात रुजवलं.
दुसरीकडे बाबासाहेबांनी शिक्षणाचं मशाल घेऊन
जिथे तिथे अंधार फाडत
स्त्रीच्या अस्तित्वाला एक समानतेचं तोरण बांधलं.
त्यांनी संविधानात स्त्री-पुरुष समानतेचा ठोस दगड बसवला.
हक्कांची मशाल दिली, आवाजाचा झेंडा दिला.
पण आज?
आज ती वात परत जळतेय, पण वेदनेने!
कारण समाजाच्या कोपऱ्यात कुठे तरी
एका १० वर्षांच्या मुलीचं बालपण हरवतंय…
एका तरुणीचं स्वप्न भंग पावतंय…
एका आईचं मूक रडणं, समाजाचं मौन फोडतंय…
आज पुन्हा “ती” उठतेय – वात बनून, श्वास बनून, ज्वाळा बनून!
ती विचारते –
शिवरायांनी दिलेला सन्मान कुठे गेला?
बाबासाहेबांनी दिलेले अधिकार का गप्प बसले?
आता वेळ आली आहे –
जळणाऱ्या वातीचा श्वास फुंकून मोठा मशाल बनवायचा…
स्त्रीच्या अस्तित्वावर उठलेल्या प्रत्येक हाताला
शब्दाने, विचाराने आणि कृतीने उत्तर द्यायचं.
कारण ही केवळ वात नाही,
ही एक चैतन्यवती आहे, ती क्रांतीची नांदी आहे.
ती जळते, हो, पण फुकट नाही…
ती जळते, कारण अंधारात तीच दिवा आहे…!
लेखिका – शीतल महादेव जगताप















