
दिंडोरी प्रतिनिधी- संदीप अवधूत सह अमोल भालेराव – भारतरत्न डॉ.एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस दि.७ ऑगस्ट हा ”शाश्वत शेती दिन” म्हणुन बनकर फार्म,दिंडोरी येथे साजरा करण्यात आला.या शाश्वत शेती दिनानिमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक यांच्यामार्फत आयोजीत शाश्वत शेती कार्यशाळा अधिकारी,कर्मचारी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
भारतीय कृषि इतिहासात डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांना कृषि क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ओळखले जाते.भारतातील दुष्काळी परिस्थितीत डॉ.एम एस.स्वामीनाथ्न यांनी गहु आणि भात यांची उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्यासाठी केलेल्या त्यांच्या महत्वपुर्ण कार्यामुळे भारत अन्नधान्यात स्वयंपुर्ण झाला.तसेच देश आर्थिकदृष्टया मजबुत झाला.डॉ.एम. एस.स्वामीनाथन यांना भारतीय हरीत क्रांतीचे जनक म्हटले जाते. देशासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणुन केंद्र शासनानी त्यांना सन२०२४ मध्ये भारतरत्न या सर्वोच्छ नागरी पुरस्काराने सन्मानीत केलेले आहे.
या पार्श्वुभुमीवर भारतरत्न डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त दि.७ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्र शासनाने शाश्वत शेती दिन म्हणुन दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कार्यक्रमांतर्गत विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांच्या शेती क्षेत्रातील योगदान आणि शाश्वत शेती संकल्पनेबद्दल आणि शाश्वत शेतीतील विविध घटक याबाबत सखोल मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी शाश्वत शेती गरज आणि पुढील वाटचाल याबाबत माहिती दिली. प्रकल्प संचालक आत्मा अभिमन्यु काशिद यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन बाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. शाश्वत शेती फाऊंडेशन आणि सह्याद्री फॉर्मचे मंगेश भास्कर यांनी शाश्वत शेती,नैसर्गिक शेती,दहाड्रम थेरी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मंगेश व्यवहारे,कृषी विज्ञान केंद्र, नाशिक यांनी जैविक निविष्ठा, बुरशीनाशके,कीटकनाशके बनविण्याच्या पद्धती बाबत माहिती प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना दिली. पिक विमा काढण्यासाठी देखील शेतकऱ्यांना अंतिम मुदतीच्या आत काढून घ्यावा आपल्या पिकाचे संरक्षण करावा असे आव्हान केले. तसेच नैसर्गिक शेती करणारे संदीप जाधव, शाम मोगल यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास सोनवणे,सूत्रसंचालन चेतन चव्हान यांनी केले. आभार प्रमोद अहिरराव , बी.टी.एम यांनी मानले.यावेळी शेतकरी व कृषी विभागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रताप बनकर यांनी परिश्रम घेतले.















