
कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होत असलेल्या पर्यावरणीय समस्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन ही सर्वात गंभीर समस्या बनली आहे. कचऱ्याचे ढिगारे, चुकीची विल्हेवाट आणि जागृतीचा अभाव यामुळे पर्यावरण प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, कोरची येथे घनकचरा व्यवस्थापन विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
समिधा फाऊंडेशन, पुणे तथा नगरपंचायत कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने समन्वयक म्हणून सचिन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे मार्गदर्शन केले. त्यांनी ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा व सॅनिटरी कचरा यांचे वर्गीकरण कसे करावे, त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी लावावी व विविध प्रकारच्या कचरा गोळा करण्यासाठी लाल,निळा, हिरवा व काळ्या रंगाच्या कचराकुंडीचा वापर, तसेच विद्यार्थीदशेतूनच पर्यावरणपूरक सवयी आत्मसात करणे का गरजेचे आहे, याचे समर्पक विवेचन केले.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक भैयालाल कुरसंगे सर, मुलांचे वसतिगृह कोरचीचे वार्डन सरकुंडे सर, हरीश कामडी, अरुण कायंदे, मनोज गजभिये, राहुल अंधारे, अभिमन्यू वाटगुरे,प्रमोद शंभरकर, क्रिष्णा गावळे,गुरुराज मेंढे, धनश्री परतेती, गीता राऊत, प्रीती खंडाते,ओमप्रकाश रहिले, नैना येंगलवार तसेच शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सुषमा अंबोणे यांनी केले.
पर्यावरण संवर्धनाची भावना विद्यार्थी तसेच उपस्थितांमध्ये दृढ करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. शाळेतून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी पर्यावरणाबद्दल अधिक जबाबदार बनतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.















