
राजुरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाराष्ट्र राज्य सरकारने आज विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला आणि कामगारांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा असल्याची टीका चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी केली आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना श्री धोटे म्हणाले की, राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सुरक्षा आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा या गंभीर समस्यांवर या अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव, सिंचन व्यवस्था, पीकविमा, वाढत्या शेतकरी आत्महत्या इत्यादी बाबतीत ठोस निर्णय अपेक्षित होते; मात्र सरकारने केवळ घोषणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. शेतकरी आणि विरोधकांच्या एकजूट आणि सातत्यपूर्ण संघर्षामुळे टाळाटाळ करणाऱ्या महायुती सरकारने अखेर शेतकरी कर्ज माफी जाहीर केली मात्र शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे स्वतःच्या जाहिरनाम्यातील आश्वासन आणि शेतकरी व विरोधकांची मागणीची दखल घेण्यात आली नाही याचे दुःख आहे. तसेच युवकांसाठी रोजगारनिर्मिती, उद्योगधंद्यांना चालना, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील सुविधा वाढविणे, वाढती महागाई कमी करणे या महत्त्वाच्या बाबींवरही अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद दिसत नसल्याचे त्यांनी नमूद केले. विदर्भातील पायाभूत सुविधा, रस्ते, सिंचन प्रकल्प तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष तरतूद अपेक्षित होती; मात्र ती करण्यात आलेली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाचा नसून केवळ घोषणांचा आणि आकड्यांचा खेळ असल्याची टीका करत सरकारने जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे धोटे यांनी सांगितले. एकूणच, हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा नसून राज्यातील शेतकरी, युवक आणि मध्यमवर्गीयांना निराश करणारा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.















