
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद परिसरातून दिवसाढवळ्या एका तरुणाचे फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपहरणामागील खरे कारण समोर आल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले आहेत. एका २७ वर्षीय तरुणीने संबंधित तरुणाशी जबरदस्तीने लग्न करण्यासाठी हा संपूर्ण कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी मुख्य सूत्रधार असलेल्या तरुणीसह एकूण ८ आरोपींना अटक केली आहे.
घटना काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-अहिल्यानगर महामार्गावर लोणीकंद परिसरात काही जणांनी एका तरुणाला भररस्त्यात अडवले. त्यानंतर त्याला बळजबरीने गाडीत बसवून पळवून नेले. भरदिवसा घडलेल्या या थरारक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी वेगाने हालचाली करत अवघ्या काही तासांतच अपहृत तरुणाची सुखरूप सुटका केली.
अपहरणामागचे धक्कादायक कारण
सुरुवातीला हे अपहरण खंडणी किंवा जुन्या वैरामधून झाले असावे असा अंदाज होता. मात्र, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता वेगळाच प्रकार समोर आला. एका २७ वर्षीय तरुणीला संबंधित तरुणाशी लग्न करायचे होते. तरुणाने नकार दिल्याने तिने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याचे अपहरण करण्याचा कट रचला आणि त्याला पळवून नेले.
कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
भरदिवसा महामार्गावर घडलेल्या या घटनेमुळे पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या विचित्र आणि थरारक घटनेची सध्या पुणे जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू आहे. “लग्नासाठी आता फक्त मुलीच नाही, तर मुलेही पळवली जातात,” अशी संतप्त आणि आश्चर्यकारक प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.















