
सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आज दि. १९ : “देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे मुंबईचे प्रदुषण खूप कमी झाले आहे. याकामी सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो आहे”, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
‘स्वच्छता ही सेवा २०२४ (SHS)’ या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंग्री मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के.एच.गोविंदराज, मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, उपस्थित होते.














