प्रबोधिनी न्युज नेटवर्क – कराची : लग्नसाठी बसमधून वऱ्हाड निघालं, गाणी आणि गप्पा सुरू होत्या, लग्नाला जायचं म्हणून सगळं वातावरण आनंदी होतं आणि एका क्षणात या आनंदावर विरजण पडलं. काळानं घात केला आणि बस नदीत कोसळली.
या भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बस लग्नसमारंभासाठी जात होती. यात वऱ्हाडी मंडळी होते.
फैज उल्लाह फाराक यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील दियामेर जिल्ह्यातील थालिची भागात 26 जणांना घेऊन जाणारी बस नदीत पडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केलं, दोन लोकांचे प्राण वाचवण्यात यश आले.
“बचाव पथकांना 17 मृतदेह आणि दोन जखमी लोकांना वाचवण्यात यश आले आहे आणि आठ लोक अद्याप बेपत्ता आहेत,” असं स्थानिकांनी सांगितलं आहे. बसचा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. बसवरचं नियंत्रण सुटलं की आणखी काय अडचण आली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हा भीषण अपघात पाकिस्तानच्या गिलगित-बाल्टिस्तान जीबी या परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे. सिंधू नदीमध्ये ही बस कोसळल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

