मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण संघटनेचे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
विवेक बा मिरालवार तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आलापल्ली, २६ डिसेंबर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कार्यरत विभागातच कायम करावे. त्यांचा रोजगार हिरावू नये, अशी मागणी अहेरी येथील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण तालुका संघटनेच्या वतीने अहेरीचे अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रशिक्षण काळात युवकांना विद्यावेतन मिळत असल्याने तात्पुरता रोजगारसुद्धा मिळालेला आहे. प्रशिक्षणादरम्यान शासकीय कामकाजाच्या विविध बाबींचे सखोल मार्गदर्शन मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून शासनाची कार्यप्रणाली जवळून समजून घेण्याची संधी मिळाली आहे. या प्रशिक्षणानंतर रोजगार उपलब्ध होत
नसेल तर प्रशिक्षणाचा फायदा काय? प्रशिक्षणानंतर रोजगार द्यायचे नव्हते तर प्रशिक्षण दिले कशाला? असे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. प्रशिक्षणानंतर कौशल्य असून सुद्धा बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांना त्याच विभागात कायम करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन येरोजवार, सूरज मडावी, प्रियंका सिडाम, रमादेवी तोटावार, पूजा अनमलवार, पूजा गौडेवार, श्वेता अल्लेवार, प्राची गर्गम, अंजली चालूरकर, लता बतकु, गाडगे, चुनारकर, गेडाम आदी उपस्थित होते.

