कधी शाई कमी
कधी कागद हरवले
मनातील शब्द मात्र
धावून पुढे सरसावले
स्त्रियांमध्ये असणाऱ्या विविध पैलू, गुण आणि कलांची सरमिसळ म्हणजेच त्यांच्या आयुष्याचे वेगळेपण. प्रत्येक स्त्री ही तिच्या व्यक्तिमत्त्वाने विचारांने आणि कृतींनी एक अद्वितीय रंग उधळत असते. तिच्या व माझ्या विविध रंगी आयुष्याचा उत्सव साजरा करणारा हा लेख.
स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसून ती एक सृजनशिलता, करुणा आणि धैर्याचे प्रतीक. एक आई म्हणून ती मुलांसाठी संपूर्ण विश्व बनते. तर एक पत्नी म्हणून ती संसाराचा पाया रचते. एक व्यावसायिक, एक कलाकार, एक विचारवंत म्हणून ती आपले स्थान निर्माण करते.
स्त्रियांच्या जीवनातील एक एक टप्पा एक वेगळा रंग दाखवतो. ग्रामीण भागातील शेतीत कष्ट करणारी महिला असो किंवा शहरी उच्चभ्रू आयुष्य जगणारी व्यावसायिक स्त्री असो, प्रत्येकीच्या जीवनात काहीतरी खास वैशिष्ट्य असते. घरात लहान गोष्टी जपणारी गृहिणी असो किंवा समाजात बदल घडवणारी सामाजिक कार्यकर्ते असो, तिची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण असते.
आधुनिक काळात स्त्रिया स्वतःच्या कर्तृत्वाने नवीन इतिहास घडवत आहेत. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपले नाव मोठे केले आहे. जागतिक पातळीवर ते आपले कार्य सिद्ध करत आहेत.
स्त्रीयांनी कलाविष्काराने नेहमीच समाजाला प्रेरित केले आहे. गायन, नृत्य, हस्तकला, चित्रकला, अभिनय, लेखन यांसारख्या कलांमधून त्यांनी आपले कौशल्य दाखवले आहे.
वाचकहो आपणही एक स्त्री असाल तर आपल्यातील कलागुण ओळखा आणि त्याला नक्कीच वाव द्या. आपल्यातील कला हे आपल्यासाठी जीवन जगण्याच फक्त माध्यम किंवा फक्त विरंगुळा म्हणून नाही, तर कलेच्या माध्यमातून आपण समाजासाठी एक प्रेरणास्थान देखील आपण बनु शकतो. मनातील दुःख,वेदना यातून बाहेर पडण्यासाठी कलेचा पण योग्य प्रकारे वापर करून घेऊ शकतो. जीवन सकारात्मकपणे जगण्याचे एक तंत्र म्हणजे कला होय.
मनातील घुसमटलेल्या विचारांना वाट मोकळी करून देण्यासाठी मी लेखन सुरू केले आणि आज एक लेखिका कवयित्री बनले आहे. मनात आलेले विचार, भावना कागदावर झरझर उतरू लागतात आणि तयार होते एक सुंदर लेख आणि काव्य. अशाप्रकारे लेखनाच्या माध्यमातून माझे विचार व भावना एकाच वेळी अनेक वाचकांपर्यंत पोहोचतात. वाचकही मला फोन करून आपल्या प्रतिक्रिया कळवतात. चांगल्या विचारांची देवाण-घेवाण यातून घडते.
लेखन ही समाजाशी संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. वास्तववादी विचार,अनुभव लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करताना आपण अनेक महत्त्वाचे संदेश समाजापर्यंत पोहोचू शकतो. शिक्षणाचे महत्त्व, अन्याय, विषमता, पर्यावरण संवर्धन, स्त्री सक्षमीकरण,बालकांवरील संस्कार,पक्षी प्राण्यांप्रति दयाभाव असे अनेक विषयावर मीं लेखन करते.
एक शिक्षिका म्हणून सेवा करत असताना, विद्यार्थ्यांना व त्यांच्या कलागुणांना केंद्रस्थानी ठेवून, विद्यार्थीहिताचे अनेक उपक्रम राबवत असल्यामुळे आज मी’आदर्श शिक्षिका’ पुरस्कारासाठी पात्र ठरले आहे. याचबरोबर माझ्या स्वतःच्या मुलांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उच्चशिक्षण दिले आहे. त्यामुळे माझ्या मुलांसाठी मी ‘आदर्श माता’ठरली आहे.हरवलेल्या वाट चुकलेल्या माणसाचा संघर्ष, तसेच प्राण्यांच्या व्यथा व त्यांचा जीवन संघर्ष लेखनाच्या माध्यमातून मीं अनेकांपर्यंत पोहोचू शकले . माझ्या दर्जेदार लेखनासाठी मला साहित्यभूषण, काव्यभूषण पुरस्कार देखील जाहीर झाले आहेत.
गृहिणी,माता,शिक्षिका,लेखिका,कवयित्री असा हा माझा जीवनाचा प्रवास सुरूच आहे. आणि खरं सांगायचं तर ह्या संपूर्ण प्रवासाला’संघर्षाचा रंग’ आहे.
संघर्षाचा रंग वेगळा
तोच यशाचा गंध
दुःखाच्या सावटात
शोधी नवा आनंद
अजूनही पल्ला दूर
पावलांना काटे टोचती
लेखणी साद घाली
चालत रहा तू पुढती.
लेखिका सौं.पल्लवी संजय आल्हाट
अहिल्यानगर

