संपलं एक वर्ष,
अनुभवांनी सजल जीवन…
शिकवण देऊन गेला
आलेला प्रत्येक क्षण..
नववर्षाची पूर्वसंध्या म्हणजे जुन्या वर्षाचा निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत. हा दिवस प्रत्येकाच्या मनात विशेष स्थान ठेवतो, कारण तो मागील वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्याची आणि नवीन सुरुवातीसाठी प्रेरणा घेण्याची संधी देतो. या दिवशी प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्याचा आढावा घेतो.चांगल्या आणि वाईट क्षणांची उजळणी करतो.
चांगल्या आठवणींचा खजिना किंवा पिटाराच आपण नववर्षाच्या पूर्वसंधीला उघडून पाहत असतो.
प्रत्येकाला आयुष्यात काही सुवर्णक्षण भेटतात, जे आठवताना चेहऱ्यावर हसू उमटते. काहींनी या वर्षात नवी मैत्री जुळवली असेल, स्वप्नांची पूर्तता केली असेल किंवा कौटुंबिक आनंदाचा अनुभव घेतला असेल. कदाचित हा वर्षाचा काळ असेल जिथे पहिल्यांदा स्वतःसाठी काही मोठे ध्येय गाठले गेले असेल.
पदवी मिळवणे, नोकरीत बढती घेणे, व्यवसायात प्रगती करणे किंवा कुटुंबात एखाद्या नव्या सदस्याचं आगमन.मित्रांसोबत केलेल्या सहली, सण-उत्सवांचा आनंद, आणि साध्या पण अर्थपूर्ण क्षणांमध्ये दडलेलं सुख.प्रत्येक वर्ष चांगल्याच आठवणींनी भरलेले असेलच असे नाही. काहींनी गमावलेल्या व्यक्तींची आठवण ठेवली असेल, अपयशाचा सामना केला असेल, किंवा निराशेच्या काळातून प्रवास केला असेल.एखाद्या प्रिय व्यक्तीचे निधन, आरोग्याच्या समस्या, किंवा नोकरी वा व्यवसायातील अडथळे.काही वेळा नाती तुटण्याच्या वेदना, स्वप्नांवर आलेले अपयशाचे सावट किंवा परिस्थितीशी झगडण्याचा संघर्ष.
चांगल्या आठवणी आपल्याला समाधान देतात, तर वाईट आठवणी शिकवण देऊन पुढे जाण्याचा आत्मविश्वास देतात. या पूर्वसंध्येला आपण मागे वळून पाहतो, पण पुढे जाण्याचा निर्धार करतो.
चांगल्या आठवणींना त्या आयुष्यभरासाठी साठवून ठेवायच्या आणि त्या क्षणांची कदर करायची.वाईट क्षणांना ते फक्त शिकण्यासाठी वापरायचे आणि मागे सोडायचे.
या दिवशी अनेक ठिकाणी आनंदसोहळा साजरा केला जातो. दिवसभराचे हिशेब मिटवून, कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत एकत्र येऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष केला जातो. काही लोक ध्यानधारणेद्वारे शांतपणे नवीन वर्षाचा आरंभ करतात, तर काही जोरदार पार्टी करून आनंद व्यक्त करतात.
नववर्षाची पूर्वसंध्या ही फक्त आनंद साजरा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या जीवनाचे प्रतिबिंब पाहण्याचा, ध्येय निश्चित करण्याचा आणि नव्या आशेने पुढे जाण्याचा दिवस आहे. चांगल्या आठवणींचा आधार घेऊन आणि वाईट क्षणांपासून शिकून आपण जीवनात पुढे वाटचाल करतो. म्हणूनच, या दिवशी जुन्या गोष्टींना निरोप देऊन नवीन अध्याय सुरू करावा, एक नवीन संकल्प करावा,जिथे संधी, प्रगती, आणि आनंदाची नवी झलक असेल.
भले बुरे जे घडून गेले,
विसरून जाऊ
सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर
आपणास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
सौं.पल्लवी संजय आल्हाट
अहिल्यानगर

