prabodhini news logo
Home चंद्रपूर 100 दिवस कृती आराखड्याचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

100 दिवस कृती आराखड्याचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

0
131

चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरीता पहिल्या 100 दिवसांमध्ये सात मुद्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याच्या राज्य शासनाच्या सुचना आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.1) विभाग प्रमुखांचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) संजय पवार, अतुल जटाळे (पुनर्वसन), आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा खनीकर्म अधिकारी सुरेश नैताम, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना) सीमा गजभिये आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, 100 दिवस कृती आराखडा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. मुख्यालय स्तरावरून याचा नियमित आढावा घेण्यात येत असून या उपक्रमाला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे सर्व विभागांनी आपल्या विभागाची अपडेट माहिती अपलोड करावी. कार्यालयीन कामकाज जसे आस्थापना, लेखा, जडवस्तु संग्रह, निर्लेखन व इतर विषय परिपूर्ण ठेवावेत. प्रत्येक विभाग प्रमुखांनी आठवड्यातून किमान एक दिवस क्षेत्रीय भेटी द्याव्यात. तसेच सर्व अधिकारी- कर्मचा-यांसोबत बैठक घ्यावी. जेणेकरून सुसंवाद वाढण्यास मदत होईल. तसेच कार्यालयातील कर्मचा-यांना आणि बाहेरून आलेल्या अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ठेवावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here