prabodhini news logo
Home चंद्रपूर उद्योगविषयक बाबींचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

उद्योगविषयक बाबींचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

0
111

चंद्रपूर – दि. 3 : जिल्ह्यात उद्योगांना चालना देणे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे तसेच ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत निर्यात धोरण निश्चित करणे आदी बाबी संदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, उद्योगांमध्ये 80 टक्के स्थानिकांना रोजगार देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यात सर्व उद्योगांनी या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी. याबाबत कोणतीही तक्रार येऊ देऊ नका. कंत्राटदारांकडून भरती प्रक्रिया होत असल्यास संबंधित कंत्राटदारानेसुध्दा या नियमाचे तंतोतंत पालन करावे. स्थानिक लोकांना रोजगार पुरविण्यासंदर्भातील वार्षिक अहवाल महाव्यवस्थापक यांच्याकडे सादर करावा.
उद्योगांना मनुष्यबळ पुरविण्यासाठी विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहेत. ज्या उद्योगांना अशा प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क करावा. सन 2024-25 मध्ये कंपन्यांनी खर्च केलेल्या सामाजिक दायित्व निधीबाबत (सी.एस.आर.) सर्व कंपन्यांचा आढावा, तसेच सन 2025-26 च्या खर्च नियोजनाबाबतचा अहवाल त्वरीत सादर करावा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील मागील वर्षी 20 टक्क्यांनी वाढलेली निर्यात व यावर्षी निर्यात वाढीकरीता उपाययोजना करणे, तसेच ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत जिल्ह्यातील तांदूळ आणि बांबू प्राधान्याने निर्यात व्हावे, याबाबत आढावा घेण्यात आला. चंद्रपूरमध्ये टेस्टिंग लॅब, मुल येथे लॉजिस्टिक हब तसेच बँक ऑफ इंडिया, चंद्रपूर येथे परकीय चलन कक्ष प्रस्तावित असून चंद्रपूर जिल्ह्यातील निर्यात वाढीकरीता खुप फायदेशीर ठरणार असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here