सुरवातीला मी जपानी भाषा शिकण्यासाठी इथल्या मोफत केंद्रात जात असायची. त्या केंद्रात शिकवणारे आणि केंद्र चालवणारे सर्व साठ वर्षाच्या वर होते. तरीही त्यांचा उत्साह बघून मलाच कसे तरी होत असायचे. त्याचं बोलणं, त्यांचं आनंदी असणं, हसणं, विदेशी लोकांना संस्कृती समजावून सांगणं आणि समजून घेणं हे सारे काही ते मनातून करत असायचे. समोरच्या बद्दल मान आणि स्वत:चा स्व सन्मान जपत जीवनाचा आनंद अनुभवणारे वयस्कर त्या केंद्रात बघितले की वाटायचे हा देश प्रगत आहे. कारण इथले म्हातारे प्रगत आहेत, त्यांना बघून प्रश्न पडायचा ह्या लोकांना ह्यांच्या सुना मुलांच्या चुगल्या करायच्या नाहीत का? त्यांच्या आजवरच्या आयुष्याला कोसायचे नाही का? स्वत:चा मोठेपणा मिरवायचा नाही का? यांना मान नको?
असो तो विषयच वेगळा आहे. त्यावर अर्धविराम देऊन पुढे जाऊया… कसं आहे ना विषय ओढला तर कुठल्या कुठे जाईल…
त्यातल्या त्यात जवळपास सर्वच वयस्कर मंडळी दिवसभर कुठे ना कुठे छोटी मोठी नोकरी करत असत, हे मात्र नवल. कुणावर अवलंबून नव्हतेच ते, आणि त्यांचा ह्यासाठी कुणावर आरोप नव्हता हे त्याहून नवल.
केंद्रात जाण्यासाठी मला दोन स्टेशन जावे लागत असायचे, म्हणजे रेल्वे वापरावी लागत होती. त्या दिवशी मी माझा वर्ग पूर्ण करून परत येत होते. शेजारी एक म्हातारा बसला होता. सहज माझ्याशी बोलला,
“कुठल्या देशातून आहेस तू?”
मी उत्तर दिले, “इंडिया !!”
आणि तो भारताबद्दल बोलू लागला, त्याला ताजमहाल माहित होता, त्याला मुंबई माहित होती. केरलाही त्याने मला वर्णन करून सांगितला, बोलता बोलता म्हणाला,
“तुझ्या आजोबाच्या वयाचा आहे मी.”
मलाही राहवले नाही मी सुद्धा वय विचारले, तर म्हणाला,
“नव्वद पूर्ण होती ह्या महिन्यात.
मी काही बोललेच नव्हते, मी तर नुसती पंचवीस वर्षाची होती. त्याच्याकडे बघून ते माझ्या वडिलांच्या वयाचा वाटले होते. आणि माझ्या आजोबांना ह्या वयाचे मी बघितले नव्हते.
मी विचार केला, माझ्या कडे तर एवढ्या वयाचा माणूस पलंगावरून उतरणार नाही. घरात बसून राहील जगला तर आणि घरात बडबड करत राहणार हे मात्र वेगळं. पण हे आजोबा तर आज गोल्फ खेळून आले होते. हे लोक एवढे जगतात तरी कसे हा प्रश्न मला त्यावेळी पडला होता. आज बऱ्याच वर्षाने इथली संस्कृती समजली, रहाणीमान जरा कुठे उमगायला लागले, इथल्या लोकांची जगण्याची कला कळायला लागली आणि मग प्रश्नांची उत्तर मिळणे सुरू झाले.
To be continues…
लेखिका – उर्मिला देवेन
जपान

