
राहुल वसानिक जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली – गडचिरोली : स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३५ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून स्पर्धेचे हे तिसावे सत्र असल्याने यावेळी दोन कवींना सन्मानित करण्यात आले आहे. त्यात गडचिरोली येथील प्रसिद्ध कवी राजरत्न पेटकर व चंद्रपूर येथील प्रसिद्ध कवयित्री डॉ. मंदा पडवेकर या दोन कवींची आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांच्या अनुक्रमे “पावसासारखा पाऊस” व “तेथे कर माझे जुळती” या कवितांची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
राजरत्न पेटकर हे गडचिरोली येथील प्रसिद्ध कवी असून ते एस.टी.महामंडळ गडचिरोली येथे वाहक पदावर कार्यरत आहेत. नुकत्याच त्यांच्या ‘परिवर्तन’ या नाटकास एस.टी. महामंडळाच्या विभागीय स्पर्धेत निर्मीतीचे व अभिनयाचे पुरस्कार प्राप्त झाले आहे. अनेक कविता व नाटकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. तर डॉ. मंदा पडवेकर हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी आहेत. अनेक कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे. विविध पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. या दोन साहित्यिकांना नाट्यश्रीच्या स्पर्धेत एकाच वेळी पुरस्कृत करण्यात येत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.
या तिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने स्वप्नील बांबोळे, गजानन गेडाम, संगीता ठलाल, प्रेमिला अलोने, यु. एन. राऊत, रोहिणी पराडकर, जयराम धोंगडे, वंदना सोरते, विलास टिकले, पुनाजी कोटरंगे, रंजना चुधरी तुळशीराम उंदीरवाडे, राजरत्न पेटकर, गणेश रामदास निकम, राजू सोनटक्के, मुरलीधर खोटेले, सुभाष धाराशिवकर, सोनाली रायपुरे, डॉ. मंदा पडवेकर, केवळराम बगमारे, पी. डी. काटकर, माधुरी अमृतकर, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, उपेंद्र रोहनकर, प्रभाकर दुर्गे, प्रियंका वाकडे, वामनदादा गेडाम, रेखा दिक्षित, ज्योत्स्ना बन्सोड, सुनिता तागवान, भावना रामटेके, मंदाकिनी चरडे, मिलींद खोब्रागडे, वसंत चापले, व सुजाता अवचट इत्यादी कविंनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे .














