prabodhini news logo
Home नागपूर आजचा लेख – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

आजचा लेख – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

0
234

आजचा लेख – डॉ.बाबासाहेब आंबेडकर दि. 4/8/24

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समता,बंधुता, स्वातंत्र्य ही मूल्ये स्विकारलेला समाज निर्माण करायचा होता.बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा हाच मूलाधार होता.सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षण हेच एकमेव औषध आहे असे त्यांनी एका सभेत म्हटले होते.वंचित समाजाचे तारणहार असलेले बाबासाहेब शिक्षणाविषयी खूप जागृक होते.त्यांनी घरच्या बिकट परिस्थितीत शिक्षण घेतले आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव त्यांनी समाजबांधवांना करून दिली.त्यांनी दलित समाजाला शिकता यावं यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.ज्ञानाअभावी व्यक्ती आणि समाजाचे जसे नुकसान होते, तसेच एखादी व्यक्ती किंवा समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारणे अशी बाबासाहेबांची धारणा होती.
बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व भारत सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तीन लाख रुपयांचा निधी मिळवला होता.त्यामुळे ब-याच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू लागली होती.शिक्षण हा जीवनाचा पाया आहे असे त्यांचे मत होते.ज्यांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही त्यांच्यासाठी सक्तीचा कायदा असावा असे त्यांनी म्हटले.शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते व्हावे, असे डॉ. आंबेडकर म्हणायचे.त्यांनी समाजात एक मोठी क्रांती घडवून आणली.शिक्षण समाजपरिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे, शिक्षणामुळे माणसाला आपले कर्तव्य आणि हक्क यांची जाणीव होते असे त्यांचे मत होते.तळागाळातील लोकांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले.प्राथमिक शिक्षण सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून प्राथमिक शिक्षणाकडे शासनाचे विशेष लक्ष असले पाहिजे असे त्यांचे विचार होते.मुलगा/मुलगी एकदा शाळेत घातल्यानंतर ती/तो पूर्णपणे सुशिक्षित होऊनच, गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावे असे प्रगल्भ विचार बाबासाहेबांचे होते.समाजातील प्रत्येकालाच शिक्षण मिळावे यासाठी त्यांची तळमळ होती.प्रज्ञा,शील,करूणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षण अतिशय आवश्यक आहे असे विचार त्यांनी मांडले.शिक्षण प्राप्त झाल्याने बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ होऊन चांगले-वाईट यांतील फरक समजायला लागतो.म्हणून प्रत्येकाने शिक्षण घेतलेच पाहिजे असे त्यांचे विचार होते.त्यांनी मुंबईला सिध्दार्थ काॅलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची सुरूवात केली.त्यांनी विधिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांमध्ये प्रभुत्व प्राप्त केले होते.दलित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले.त्यांनी ‘लोकशिक्षक’ या नावाने अनेक शैक्षणिक कार्य करून आपले शिक्षणविषयक विचार मांडले.त्यांनी दीनदलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला.मनामनात त्यांनी शिक्षणाचे चैतन्य जागवले.शिक्षण म्हणजे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे असे त्यांचे मत होते.शिक्षणाने माणसाला आपल्या हक्काची जाणीव निर्माण होते असे त्यांचे विचार होते.
बाबासाहेब चार वर्षे अमेरिकेत राहिले.तेथील नवी संस्कृती,नवा देश,नवे ज्ञान त्यांनी अनुभवले होते.भारतात परतल्यावर त्यांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न करण्याचे ठरवले.शिक्षणाशिवाय समाजात समानता येणं शक्य नाही याची खात्री त्यांना पटली.त्यांनी समाजबांधवांना ” शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश दिला.विद्यार्थ्यांशी बोलताना ते नेहमीच म्हणत, विद्यार्थी दशेत ज्ञानार्जन चालू असता त्यांनी आपल्यासमोर निरंतर ज्ञानार्जन हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवावे.स्त्रियांच्या प्रगतीवर समाजाची प्रगती अवलंबून आहे असे बाबासाहेब म्हणत.त्यांचे स्त्रीमुक्ती विषयक कार्य फक्त उपेक्षित, वंचित स्त्रियांपर्यंत मर्यादित न राहता सर्व स्तरातील स्त्री वर्गाच्या उध्दाराचे कार्य त्यांनी हाती घेतले होते.त्यांनी आपल्या लिखाणातून, भाषणातून, चळवळीतून स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाबद्दल आपले विचार मांडले.आपण कोणत्या पातळीवर आहोत याची जाणीव झाली पाहिजे, त्याशिवाय आपल्यातील माणूस जागा होणार नाही असे त्यांचे मत होते.त्याकरता एकच मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण,असे बाबासाहेब म्हणत.

लेखिका – लैलेशा भुरे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here