prabodhini news logo
Home गोवा आजचा लेख- संत गाडगेबाबा

आजचा लेख- संत गाडगेबाबा

0
129

आजचा लेख संत गाडगेबाबा दि 4/8/24

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.अनेक संत महाराष्ट्रात जन्माला आले.समाजसुधारणेचे व्रत त्यांनी अंगिकारले.. स्वतःच्या संसारावर पाणी सोडून समाजासाठी झटले.समाज हेच आपले कुटुंब हेच धोरण ठेवले.रंजल्या गांजलेल्या लोकांना आपले म्हटले..त्यापैकी संत गाडगेबाबा हे एक महाराष्टातील अलौकिक विभुतीमत्व , त्यांचा जन्म एका सामान्य धोबी परिवारात २३ फेब्रूवारी १८७६ रोजी महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. त्यांचे पुर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर..लहानपणीच पितृछत्र हरविल्यामुळे त्यांचे बालपण मामाकडे गेले.मामाकडे भरपूर शेती होती.लहानपणापासून त्यांनी अनेक कष्टाची कामे केली.त्यांचे लग्न झाले.त्यांना मुली झाल्या पण त्यांचे मन संसारात रमले नाही.त्यांनी घरदार सोडले व समाज सुधारणेचे कार्य हाती घेतले.किर्तनाच्या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य करणारे संत गाडगेबाबा हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होते.संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरू मानीत असत.पण मी कुणाचा गुरू नाही व मला कोणी शिष्य नाही असे ते सांगत असत.

शिक्षणाप्रती त्यांना खूप आदर होता.प्रत्येकाने आपल्या मुलांना शिक्षण दिलेच पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा.अध्यात्मातून शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले.विद्या हे श्रेष्ठ धन आहे ज्यांच्याजवळ विद्या नाही ते गरीब राहतात.ते जातपातही मानत नसत.जगात एकच जात आहे ती म्हणजे माणूस असे ते म्हणायचे.अंधश्रद्धेचा त्यांनी नेहमीच विरोध केला.देव देवळात नाही.तो दीन दुबळ्यात आहे.देवासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा तो विद्यार्थ्यांवर खर्च करा.माणसाचे खरे देव त्याचे आईबाप आहेत.त्यांचा आदर करा.गोरगरीबांवर दया करा परोपकार केला तरच मनुष्य जन्म आहे. अश्या उदात्त विचारांचे ते प्रणेते होते.

त्यांच्या मनामध्ये सर्वाविषयी आपुलकी प्रेम होते. अनाथ, अपंग, दीन दुबळ्या लोकांची त्यांनी सेवा केली. समाजातील अज्ञान ,अंधश्रद्धा, अस्वच्छता, दुर करण्यासाठी त्यांनी किर्तनाच्या माध्यमातून प्रयत्न केले.त्यांना स्वच्छता अभियानाचे जनक असेही म्हणतात. त्यांनी नाशिक, देहू आळंदी येथे धर्मशाळा बांधल्या. रुगणासाठी रूग्णालयात बांधली,अनेक नद्यांकाठी घाट बांधले.

त्यांना राष्ट्रसंत, समाजसुधारक,संत ,कर्मयोगी, गाडगे महाराज अश्या अनेक नावांनी संबोधले जाते पण देवमाणूस आणि संत माणूस म्हणून जगण्यापेक्षा माणूस म्हणून जगणे त्यांनी मान्य केले.आचार्य अत्रे यांनी तर त्यांना चालते बोलते विद्यापीठ म्हटले आहे.आज या जगात ते नाहीत पण त्यांचे विचार जीवंत आहेत…

लेखिका – गुलाब अनिल वेर्णेकर
गोवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here