आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते बाबुपेठ येथील विपश्यना केंद्राचे भूमिपूजन

0
109

समाज परिवर्तनासाठी विपश्यना केंद्राचे योगदान महत्वाचे – आ. किशोर जोरगेवार.

भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर- विपश्यना साधना केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठीच नाही तर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी देखील प्रभावी आहे. ही ध्यान पद्धती आपल्याला आतल्या शांततेकडे घेऊन जाते, आपल्या मनातील तणाव, दुःख आणि नकारात्मक भावना दूर करते. समाजात जेव्हा अशा ध्यान साधनेचा प्रचार आणि प्रसार होतो, तेव्हा तो समाज अधिक स्थिर आणि संतुलित बनतो. आपणही बाबुपेठ येथे उत्तम विपश्यना केंद्र तयार करण्याचा संकल्प केला असून, आज त्याचे भूमिपूजन करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांमुळे बाबुपेठ येथील आंबेडकर नगर येथील धम्मभूमि महाविहार येथे विपश्यना केंद्र तयार करण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामाचे भूमिपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भिक्खु संघाच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अखिल भारतीय भिक्खु संघाचे उपसंघनायक भन्ते बोधीपालो, मुंबई प्रदेश भिक्खू संघाचे अध्यक्ष भन्ते विनय बोधी महाथेरो, महाथेरो डॉ. सुमनवण्णो, भन्ते सच्चक महाथेरो, भन्ते संघवंस थेरो, भन्ते रत्नमनी थेरो, भन्ते नागदीप थेरो, भन्ते आनंद थेरो, भन्ते धम्मप्रकाश, महाथेरो डॉ. सुमनवण्णो आदि प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते. यावेळी भव्य बुद्ध-भीमगीत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार पुढे म्हणाले की, आपण मतदारसंघाचा विकास करत असताना तो सर्वसमावेशक असावा, या दिशेने काम केले आहे. अनेक मोठी कामे आपण या पाच वर्षांत मार्गी लावू शकलो. 50 वर्ष जुनी असलेली बाबुपेठ उड्डाणपूलाची मागणी आपण मार्गी लावली असून, नुकताच हा पूल वाहतुकीसाठी सुरू केला आहे. 5 कोटी रुपयांतून आपण मतदारसंघातील 16 बुद्धविहारांमध्ये अभ्यासिका तयार करत आहोत. तसेच, चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासाचा संकल्पही आपला पूर्ण होत असून, येथील विकासकामांसाठी जवळपास 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हे सर्व कार्य आपल्या सहकार्य आणि आशीर्वादामुळे शक्य झाले आहे. आज भिक्खु संघाच्या वतीने विजय स्तंभ देऊन सत्कार करण्यात आला, हे सूचक आहे. आपला आशीर्वाद नेहमी पाठीशी राहिला आहे आणि पुढेही राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
चंद्रपूरात विपश्यना केंद्र नव्हते, त्यामुळे येथे भव्य विपश्यना केंद्र तयार व्हावे, हा संकल्प होता. आज धम्मभूमि महाविहार येथील जागेवर यासाठी निधी देता आला, याचे समाधान आहे. विपश्यना केवळ वैयक्तिक स्तरावर फायदेशीर नसून, ती समाज स्तरावरही परिवर्तन घडवू शकते. जेव्हा समाजातील व्यक्ती मनःशांतीचा मार्ग अनुसरतात, तेव्हा समाजात सकारात्मकता, सहिष्णुता आणि एकमेकांप्रती आदर वाढतो. आपला समाज सध्या अनेक तणावांनी ग्रस्त आहे – दैनंदिन आयुष्यातील ताण, मानसिक आरोग्याच्या वाढत्या समस्या. अशा काळात विपश्यना केंद्र हे एक आधारस्थान ठरू शकते, असे ते यावेळी म्हणाले.
या प्रसंगी सुप्रसिद्ध बुद्ध-भीम गायीका कळुबाई खरात आणि सुप्रसिद्ध गायक राहुल शिंदे यांनी बुद्ध-भीमगीत सादर केले. या कार्यक्रमाला नागरिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. धम्मभूमि महाविहारच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धाम्म्भूमी महाविहारच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here